Mumbai News: जवाहरलाल नेहरु पोर्ट एथॉरिटी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतातील बंदर व्यवस्थेवर आणि विशेषतः महाराष्ट्रातील जेएनपीए बंदरावर होताना दिसून येत आहे. आयात-निर्यात प्रक्रियेत विलंब होत असल्याने व्यापार क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेनपीए बंदरात कंटेनर अडकले
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उरण येथील जेएनपीए बंदरामध्ये हजारो कंटेनर विविध ठिकाणी उभे असल्याचे दिसत असून, मालवाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. बंदर परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यवस्था मंदावल्याने कंटेनर वेळेत हलवले जात नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात नाशवंत पदार्थ, खाद्यपदार्थ, फळे, रसायने आणि औद्योगिक साहित्य असल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचदरम्यान पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन चालक आपल्या मूळ गावी गेल्याने ट्रक चालकांची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी कंटेनर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून बंदर परिसरात कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी चालकांच्या अनुपस्थितीमुळे वाहतूक सेवा मर्यादित केल्याचेही समोर आले आहे. व्यापारी आणि निर्यातदारांनी केंद्र सरकार तसेच बंदर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
कंटेनर क्लिअरन्स प्रक्रिया वेगाने करण्यासोबतच अतिरिक्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बंदर प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कंटेनरची वाढती संख्या आणि मंदावलेली वाहतूक यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.