राहुल कांबळे, प्रतिनिधी
खारघरमधील (Navi Mumbai News) स्वप्नपूर्ती परिसरातील नागरिकांनी आज (17 जुलै) त्यांच्या मूलभूत हक्कासाठी हंडा मोर्चा काढत रायगड भवनवर धडक दिली. “घर मिळालं, पण पाणी नाही” या संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी होणाऱ्या वणवणीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शांततेत गांधीगिरी आंदोलन करत सिडकोच्या नियोजनशून्य कारभारावर जाहीर आक्षेप नोंदवला.
पाणी असूनही नळाला नाही थेंब
नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होत असतानाही खारघरच्या स्वप्नपूर्ती सेक्टरमधील शेकडो कुटुंबांना दररोज कोरड्या नळांचा सामना करावा लागत आहे. “वरून पाऊस आणि घरात वास”, अशी उपरोधिक स्थिती येथे निर्माण झाली आहे. अनेक वेळा सिडकोकडे तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, असा रहिवाशांचा आरोप आहे.
नक्की वाचा - Akola News : अकोल्याचा देशपातळीवर डंका; कापूस उत्पादनात मोठी कामगिरी करणारा देशातील एकमेव जिल्हा
हंडा घेऊन प्रशासनाच्या दारात
पाणीटंचाईविरोधात नागरिकांनी आज सकाळी एकत्र येत रायगड भवनवर शांततामार्गे आंदोलन छेडले. प्रत्येक जण रिकाम्या हंड्यांसह येथे दाखल झाला आणि आपल्या पाण्याच्या स्वप्नाच्या अपूर्णतेचा सरकारला आरसा दाखवला. यावेळी नागरिक म्हणाले की, “आम्ही लाखो रुपये खर्च करून घर घेतलं, पण मूलभूत गरज असलेलं पाणीच नाही. हे आमचं अपमानास्पद आणि असंवेदनशील धोरण आहे.”
सिडकोकडून कोट्यवधींचा खर्च, तरीही उपाय नाही
सिडकोकडून खारघर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा कोरोड प्रकल्प, जलवाहिनी देखभाल, आणि दुरुस्ती यांसाठी खर्च केला जातो. मात्र त्याचे परिणाम मात्र प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. “दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार पाणी बंद ठेवणं, कमी दाबाने पाणी येणं, अनेक वेळा पाणीच न येणं हे ठरलेलं बनलं आहे,” अशी तक्रार रहिवाशांनी केली.
शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला त्रस्त
या टंचाईचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या मुलांना, घरातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. “सकाळी शाळेसाठी पाणी नसलं की सगळी घाई गडबड होते. बाळांना अंघोळ घालायचं तर पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी देखील टॅंकरवर अवलंबून राहावं लागतं,” अशी व्यथा अनेक गृहिणींनी व्यक्त केली.
प्रशासनाचं मौन संशयास्पद
स्वप्नपूर्ती रहिवाशांच्या या आंदोलनानंतर प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई किंवा आश्वासन न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी इशारा दिला आहे की, “जर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर येत्या काळात उग्र आंदोलन करण्यात येईल.”