Kolhapur Politics: काँग्रेसकडून राष्ट्रवादीची मुस्कटदाबी? शरद पवार गटाचा सतेज पाटलांना थेट इशारा

Kolhapur Political; News : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज, 19 ऑक्टोबर पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेमधून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते व्ही बी पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर विविध आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये कोल्हापुरात आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेस मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतेज पाटील शरद पवार गटाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज, 19 ऑक्टोबर पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेमधून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते व्ही बी पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर विविध आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी म्हणून दोन्ही मतदारसंघात काम केलं. जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार बनवण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा वाटा आहे. मात्र असं असताना देखील कोल्हापूरचे खासदार हे फक्त आणि फक्त काँग्रेसचे असल्याचं वारंवार दाखवलं जात असल्याचा आरोप व्ही बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

(नक्की वाचा-  "...तर निवडणूक आयोगावर मोर्चा काढू", महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप )

पाटील यांनी म्हटलं की, जिल्ह्यात काँग्रेसकडून शरद पवार गटाची मुस्कटदाबी सुरू आहे. जागा वाटपांबाबतच्या चर्चांमध्ये राष्ट्रवादीचा विचार केला जात नाही. आतापर्यंत झालेल्या जागा वाटपामध्ये एकदाही शरद पवार गटाला सामील करून घेतलेलं नाही. राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर उत्तर या तीन जागांवर काँग्रेस दावा करत आहे. शरद पवार गटाला मात्र अद्याप एकाच जागेवर शिक्कामोर्तब झालं आहे. इतर जागाही आमच्या वाट्याला याव्यात  तुतारीची ताकद वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे. जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी या सर्व बाबींचा विचार करावा अन्यथा आम्ही योग्य निर्णय घेऊ असा निर्वाणीचा इशारा पाटील यांनी दिला. 

(नक्की वाचा-  सांगलीत ओढ्यात आला नोटांचा पूर! 500 रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी)

कोल्हापूर उत्तर, दक्षिणसह इतरही जागा लढवू शकतो?

महागावमध्ये होत असलेल्या मेळाव्यासाठी शरद पवार गटाला विचारात घेतले गेले नाही. अशा पद्धतीने होत असलेल्या मेळाव्याला आम्ही समर्थन देणार नाही. चंदगडमध्ये उमेदवारीबाबत शरद पवार गटाचा विचार केला जावा ही आमची मागणी आहे. वारंवार सांगून देखील आमचा विचार केला जाणार नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करण्यावर ठाम आहोत. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करायला लावू आणि कोल्हापूर उत्तरच नाही तर दक्षिण आणि इतरही जागांवर आम्ही उमेदवार उभा करू ,असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शरद पवार गटाकडून देण्यात आला.