
जम्मू काश्मीरमधील पहलगालमध्ये भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून या हल्ल्याला चोख प्रत्यूतर दिले जाईल असा थेट इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. एकीकडे केंद्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षादलासोबतच्या बैठका वाढल्या असतानाच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सर्वात महत्त्वाचे आणि मोठे विधान करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे सामना अग्रलेख?
'पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा याबाबत पंतप्रधान मोदी यांनी तीनही सैन्य दलांना सर्वाधिकार दिले आहेत. पाकिस्तानला मूंहतोड जवाब देण्याची जबाबदारी सशस्त्र दलांना दिली. याबाबतची वेळ आणि लक्ष्य आता सैन्याने ठरवायचे आहे. पाकिस्तानच्या बाबतीत काय करायचे याचा निर्णय राजकीय इच्छाशक्तीनुसार पंतप्रधान मोदींना घेता आला असता. एकतर मोदी हे पंतप्रधान आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा ते सातत्याने करीत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा पाकड्यांच्या बाबतीत आक्रमक आहेत व पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याच्या बाबतीत त्यांचे मत ठाम आहे, पण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भारतीय सैन्याला मोकळीक दिल्याचे स्पष्ट केले.. ' असे या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.
'बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपण सत्याग्रह केला व त्यासाठी तुरुंगातही गेल्याचा खुलासा खुद्द मोदी यांनी मागे केला आहे. म्हणजे मोदी यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्याचा अनुभव आहे. पाकबरोबरच्या युद्धात मोदी यांचा हा अनुभव कामी येईल. बांगलादेश युद्धाच्या वेळी मोदी 20-22 वर्षांचे असतील. आता ते 75 वर्षांचे आहेत. म्हणजे राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होतील. त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहायला हवे..' असे सर्वात मोठे आवाहनही सामनामधून करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा)
विरोधकांवर टीका..
'कश्मीरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी झाली आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदी व त्यांच्या भूमिकांना सढळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन घेऊन काय साध्य करणार? मोदी यांनी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यामुळे कश्मीरचे काय? पाकिस्तानला धडा शिकवणार काय? हे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये. आपले लष्कर सक्षम आहे. लष्कराची फत्ते झाल्यावर पंतप्रधान मोदींचे काम सुरू होईल!..' असे म्हणत विरोधकांवरही सामनामधून टीका करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world