संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur News : संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. ७ जुलै रोजी देहूतून तुकाराम महाराज आणि ८ जुलै रोजी माऊलींची पालखी आळंदीहून प्रस्थान करेल. अवघ्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीत बुडून जाईल. वारीसाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनाला येत असतात. ही संख्या मोठी असल्याने स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं जातं. त्यामुळे वारीदरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
यंदाच्या वारीत तुकाराम मुंढे यांचा पॅटर्न दिसणार...
यंदाच्या वारी काळामध्ये तुकाराम मुंडे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या वारीत एफडीएचा तुकाराम मुंडे पॅटर्न पुढे येताना दिसून येणार आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथे आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाया करून लोकांना स्वच्छ आणि चांगले अन्न मिळत याची दक्षता घेतली जाणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे तुकाराम मुंडे यांच्याशी देखील संपर्क साधणार आहेत. त्याचबरोबर यंदाच्या आषाढी वारीत संपूर्ण पालखी मार्गावर ग्रामपंचायतच्या हद्दीत दहा हजार झाडे जिल्हा परिषदेकडून लावली जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी हरित वारी करण्याचा संकल्प होत आहे.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. याच भाविकांना प्रवासाची चांगली सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या पाच हजार बसेस वारीकरीता सोडल्या जाणार असल्याची माहितीही जयकुमार गोरे यांनी दिली.