
संकेत कुलकर्णी
गोवंश हत्या बंदी विरोधात आता भाजपचाच मित्र पक्ष आक्रमक झाला आहे. हा कायदा आमच्या भल्यासाठी नाही. गावागावातले शेतकरी आम्हाला जाब विचारत आहेत. त्यामुळे आता आम्ही गो वंश हत्या बंदी कायदा पाळणार नाही. शिवाय राज्यात गोरक्षक यांच्या विरोधात गो पालक सेना उभी करणार आहे असा थेट इशाराच आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. यांच्या नेतृत्वात सांगोल्यात गो वंश हत्या बंदी कायदा विरोधात मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हा कायदा आमच्यावरच उठला आहे असा हल्लाबोल करताना भाजपला घरचा आहेर दिला आहे.
गोवंश हत्या बंदी विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. आम्ही यापुढे गोवंश हत्या बंदी कायदा पाळणार नाही.असा थेट इशारा राज्य सरकारला त्यांनी दिला आहे. या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी नव्हे तर शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू अशी थेट भूमीका खोत यांनी घेतली आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा समजला जात आहे. गोक्षकांना रोखण्यासाठी गावोगावी गोपालक सेना स्थापन करणार असल्याची घोषणाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली.
गोवंश हत्या बंदी आणि गोरक्षका विरोधात आज सांगोला तहसील कार्यालयावर रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली गोवंश रक्षक शेतकऱ्यांकडून खंडणी वसूल करतात असा गंभीर आरोप ही केला. सरकारने या प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा आठवडे बाजार बंद करावेत अशी मागणी त्यांनी केली. कायदा जगण्याच्या आड येत असेल. तर तो कायदा जनतेसाठी नसतो. त्यामुळे जनता तो कायदा पाळत नाही. तो कायदा आमच्यासाठी नाही. ज्यांच्यासाठी आहे त्यांनी कायदा पाळावा असा इशाराही त्यांनी दिला.
तो आमचं जीवन मरण ठरत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही. तो पाळणार नाही. गावावागातला शेतकरी जाब विचारत आहे. आम्ही जनावराचा गोठा ठेवायचा की बंद करायचं. मंत्र्यांनी गावागावात जावं. माझी चर्चा शेतकऱ्याबरोबर झाली. गाय म्हशीवर कसं प्रेम करावं हे शेतकरऱ्याला शिकवू नका. कथीत गो रक्षकांना, गो पालक सेना गावा गावात विरोध करणार असं ही ते म्हणाले. भाकड जनावरांना आठवडी बाजारात नेवू द्या. नाही तर ते बाजारच बंद करा अशी मागणी त्यांनी या निमित्ताने सरकारकडे केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world