जाहिरात

Raju Shetti: फाईव्ह स्टारच्या दराने खरेदी, पुरवठा मात्र हात गाड्यावरील पदार्थांचे.. जालिंदर सुपेकरांचा कारनामा

Raju Shetti:  फाईव्ह स्टारच्या दराने खरेदी, पुरवठा मात्र हात गाड्यावरील पदार्थांचे.. जालिंदर सुपेकरांचा कारनामा

 राहुल कुलकर्णी: महाराष्ट्रामधील 60 कारागृहात जवळपास 50 हजार कैदी आहेत. या कैद्यांच्या नावाखाली करण्यात आलेला  घोटाळा म्हणजे मेलेल्या मड्यावरच्या टाळूवरील लोणी खाण्यातल्या प्रकार कारागृह विभागातील अधिका-यांनी केला आहे. या घोटाळ्यात तत्कालीन कारागृह पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलिस महानिरिक्षक जालिंदर सुपेकर या दोघांच्या मास्टरमाईंडने हा कारभार घडलेला आहे, असे खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत राजू शेट्टी?
 2022-23 ते 2025-26 या वर्षात कारागृहात रेशन , कॅन्टीन तसेच इतर उपकरणे खरेदीमध्ये करण्यात आलेल्या घोटाळ्याची आकडेवारी जवळपास 500 कोटी रूपयापर्यंत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मी केलेल्या आरोपाबाबत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक , गृह सचिव यांनी सखोल चौकशी करणे आवश्यक होते. याबाबत मंत्रालयात वारंवार पाठपुरावा करूनही चौकशीबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे अखेर निदर्शनास आले आहे. पुराव्यानिशी दिलेली कागदपत्रे असतानाही या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला होता. मात्र पुणे येथील हागवणे प्रकरणात सुपेकर यांचे केलेले विविध कारनामे तसेच राज्यात इतरत्र पदावर काम करत असताना घडलेले प्रकार समोर आल्यानंतर अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांचा कारागृह घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे.

 राज्यातील कारागृहातील कैद्यांना कारागृहात 1 वेळचा चहा व दोन वेळचे जेवण वगळता बेकरी पदार्थ, फळे, भाजीपाला, गारमेंट यासह 627 प्रकारच्या साहित्याचे खरेदी दर जालिंदर सुपेकर यांनी निश्चीत केले आहेत .सदरचे दर निश्चीत करत असताना बाजारातील सर्वाधिक महागड्या वस्तू व वाढीव बाजारातील दर पकडण्यात आले आहेत. उदा. द्राक्षे 215 रूपये किलो , टोमॅटो  75 रूपये किलो ,कांदा 88 रूपये किलो ,बटाटा 87 रूपये किलो ,लसूण 370 रूपये किलो ,कोथिंबीर 130 रूपये, गूळ 90 रूपये किलो ,साखर 43 रूपये किलो ,चिकन 300 रूपये किलो,अंडी 8 रूपये, 10 पैसे प्रतिनग ,कोबी 45 रूपये, ,फ्लॉवर 68 रूपये किलो , केळी ७० रूपये डझन याच्यासह निवीयाच्या फेसवॅाशपासून ते जॅाकी कंपनीचे बनियन अंडरवियरचे दर कैद्यांच्या कॅन्टीन खरेदीकरिता दाखविण्यात आले आहेत. सदरचे दर निश्चीत करून NCCF या संस्थेला या दराने माल पुरवठा करण्याचे ॲार्डर जालिंदर सुपेकर यांनी दिले आहेत. 

नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश

जालिंदर सुपेकर यांच्या या कारनाम्यामुळे कॅन्टीन साहित्य खरेदी करत असताना कैद्यांचे दर महिन्याचे बजेट कोलमडू लागले. यामुळे तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सदरचे साहित्य खरेदीसाठी दरमहा 6 हजार रूपयावरून 10 हजार रूपये एवढी मनीॲार्डर मर्यादा वाढविली. एखाद्या गुन्ह्यांत शिक्षा भोगणारे कैद्यांचे रोजंदारी करणारे कुटूंब या दर पत्रकापुढे हतबल झाले आहे. खरोखरच या दरपत्रकात असलेल्या दराप्रमाणे व गुणवत्तेप्रमाणे त्या कंपनीच्या मालाचा पुरवठा झाला आहे का ? सदर मालाचे अन्न भेसळ विभागाकडून तपासणी ( लॅब टेस्ट) करण्यात आली आहे का ? त्या सर्व तपासणीचे रिपोर्ट राज्यातील प्रत्येक कारागृहात उपलब्ध आहेत का ? ब्रॅंडेंड कंपन्याचे नावे देण्यात आलेले साहित्य कैद्यांनीच वापरले का ? फळे , भाजीपाला व अन्य साहित्यांचा दर बाजारात ढासळलेले असताना एवढ्या महागड्या दराने का खरेदी करण्यात आले ? या सर्व गोष्टीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 

कारागृह विभागाने NCCF ला सेंट्रलाईज पध्दतीने ठेका दिला असताना या संस्थेने संपुर्ण राज्यभर सदर साहित्यांचा पुरवठा कसा केला ? NCCF ने इतर विभागांना दिलेले दरपत्रक व कारागृह विभागाचे असेलेले दरपत्रक यामध्ये फरक का आहे ? कारागृह विभागाने रेशन व कॅन्टीन वगळता टीव्ही स्क्रीन, वॉशिंग मशीन बायोमेट्रिक गेट, वॉटर कुलर, प्लायवुड ,कारखाना साठी लागणारे साहित्य, सुत, सीसीटीव्ही कॅमेरे,सॉफ्टवेअर, प्रिंटर्स, कॉम्प्युटर्स, जनसेट,फर्निचर ,लॅन केबल यासारखे साहित्य जीईम वरून खरेदी करत असताना अस्तित्वात दरापेक्षा जादा दराने खरेदी करण्यात आले आहे. सदर खरेदी केलेल्या साहित्याचा कारागृहात वापर केला जात आहे का हा संशोधनाचा विषय आहे. दिवाळीमध्ये कैद्यासाठी खरेदी करण्यात आलेले फराळाचे साहित्य कोणतीही निविदा प्रक्रिया व गुणवत्ता निश्चीत न करता करण्यात आली आहे. 

Nilesh Rane: 'नितेशने जपून बोलावं, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून...' निलेश राणेंचा भावाला सल्ला

राज्याच्या कारागृह विभागात यासारखे अनेक भष्ट्राचाराचे प्रकार घडले असून राज्य सरकारने याबाबत स्वतंत्र चौकशी समिती नेमून याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी राज्यातील कारागृह घोटाळ्यापासून ते हत्यार परवाने देणे , कारागृह मधील करण्यात आलेल्या अनधिकृत बदल्या , पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांची हत्या , उच्चभ्रू कुटूंबातील कैद्यांची कारागृहातील हाय प्रोफाईल लाईफ स्टाईल यासह सर्वच प्रकरणांचे धागेदोरे अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांच्यामध्येच गोवलेले आहेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com