Pune Dagadusheth Temple News: पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्य सरकारने या संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून अधिकृतपणे या निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे दगडूशेठ गणपती संस्थानाला राज्यातील प्रमुख आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या यादीत विशेष आणि मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या निर्णयाचे पुणेकरांकडून आणि जगभरातील गणेशभक्तांकडून स्वागत केले जात आहे.
धार्मिक पर्यटनाला आणि पायाभूत सुविधांना मिळणार गती
'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे आता या परिसराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विशेष निधीतून मंदिर आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने भाविकांची सुरक्षा व्यवस्था, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष नियोजन, स्वच्छता आणि परगावाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचा समावेश असेल. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून लाखो भाविक पुण्यात येत असतात. आता या नवीन दर्ज्यामुळे पर्यटकांच्या संख्येत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "गणपती बाप्पा मोरया! मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या क्षेत्राचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार आहे."
नक्की वाचा >> Pune News: हापूस, केशरही फिका पडेल, शेतकर्याने पिकवला कोकणलाही टक्कर देणारा 'हा' खास आंबा, राज्यभर चर्चा
दरम्यान, या निर्णयासाठी लोकप्रतिनिधी आणि संस्थानाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या निर्णयामुळे केवळ धार्मिक विकासच होणार नाही, तर पुण्याच्या स्थानिक व्यापाराला, हॉटेल व्यवसायाला आणि वाहतूक क्षेत्राला मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने पुण्याच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.