अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : बाजारभावातील अनिश्चितता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे मेटाकुटीला आलेल्या एका बळीराजाने प्रशासनाकडे एक धक्कादायक मागणी केली आहे. "कांदा शेती आता परवडत नाही, त्यातून होणारा तोटा भरून काढण्यासाठी आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्या," अशा आशयाचे पत्रच या शेतकऱ्याने तहसीलदारांना दिले असून, यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कांदा उत्पादकाची अजब मागणी
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एका शेतकऱ्याने वाढत्या महागाईच्या काळात शेती करणे किती कठीण झाले आहे, हे थेट सरकारला पत्राद्वारे कळवले आहे. नाफेडकडून दिला जाणारा 12.35 रुपये प्रति किलो हा दर अत्यंत अपुरा असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. एवढ्या कमी दरामुळे झालेला खर्चही निघत नसल्याने, आता दुसरा पर्याय उरला नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी ही टोकाची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Pune News : फुगेवाडीत एकाच दिवशी 7 जणांचा मृत्यू, दोन सख्ख्या भावांचाही समावेश; वाचा नेमकं काय घडलं? )
उत्पादन खर्चाचा आकडा वाचून बसेल धक्का
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील सुनील उकिर्डे या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 च्या हंगामात त्यांनी 10 एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती.
या लागवडीसाठी त्यांना एका एकराला तब्बल 1 लाख 20 हजार रुपये इतका खर्च आला आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेला 12.35 रुपये किलोचा खरेदी दर पाहता, त्यांना एका एकरामागे 40 ते 45 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ही आर्थिक तूट कशी भरून काढायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
सरकारच्या धोरणांवर प्रश्न
कांदा हे नगदी पीक मानले जाते, परंतु सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या हातात केवळ निराशाच येत आहे. सुनील उकिर्डे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेती करणे आता केवळ तोट्याचे व्यवहार राहिले आहेत. म्हणूनच, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गांजा लागवडीची परवानगी द्यावी, असे त्यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. एका शेतकऱ्याने जाहीरपणे केलेल्या या मागणीमुळे कृषी क्षेत्रातील सध्याच्या भीषण वास्तवावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.