Pune News: जुन्नर वन विभागात बिबट्यांची दहशत वाढलीय. नागरिकांमधील बिबट्यांची भीती व्हावी याकरिता विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 कोटी रुपये दिले. त्यातून मोठ्या प्रमाणात पिंजरे तयार करण्यात आले, त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आतापर्यंत 68 बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आजपर्यंत इतक्या कमी काळात एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळात संपवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलीय. तसंच या उपाययोजनांमध्ये उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांचे विशेष प्रयत्न असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
बिबट्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला?
जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. बिबट्यांच्या हल्ल्यात वर्ष 2025-26 दरम्यान पाच नागरिकांचा मृत्यू झालाय, मृतांच्या नातेवाईकांना 65 लाख रुपये, जखमी झालेल्या पाच नागरिकांना 2 लाख 18 हजार 964 रुपये, 1 हजार 657 जनावरांचा मृत्यू झाला यासाठी 1 कोटी 61 लाख 16 हजार 889 रुपये तसेच 17 हेक्टर 7 आर पिकांचे नुकसान झाले असून 9 लाख 79 हजार 900 रुपये असे मिळून 2 कोटी 38 लाख 15 हजार 753 रुपये इतकी नुकसान भरपाई अदा करण्यात आलीय.
(नक्की वाचा: Viral Video: बीडकर दहशतीत, स्थानिकांना रात्री घराबाहेर न पडण्याचं आवाहन; धडकी भरवणारा VIDEO आला समोर)
वनविभागाकडून राबवण्यात आलेल्या उपाययोजना
- जुन्नर वनविभागाकडून मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबट्यांचे व्यवस्थापन होण्यासाठीही उपाययोजना राबवत आहेत. वर्ष 2020-2021 ते वर्ष 2025-26 या कालावधीत 185 बिबट-बछडे पुनर्मिलन करण्यात आले आहे.
- गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त आणि प्रबोधन करण्यात येत आहे. कलापथक यांचे माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये - शाळांमधून सुमारे 40 कार्यक्रम करण्यात आले आहेत.
- बिबट्याच्या हल्ल्यांपासून कसा बचाव करावा, यासाठी माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके, कार्यशाळा आयोजन करण्यात आलंय. बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण 400 सदस्य कार्यरत आहेत.
अतिसंवेदनशील महत्त्वपूर्ण योजना
- अतिसंवेदनशील गावांत 24 X 7 जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव, आळे आणि नगदवाडी, जुन्न्र आणि गावडेवाडी या ठिकाणी 'बिबट कृती दल' बेस कॅम्प स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागातील मानव-बिबट संघर्ष मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रित झालाय.
- मे 2024 पासून विभागीय कार्यालय जुन्नर येथे नियंत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक 1800 3033) स्थापित करण्यात आलंय. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मंजुरीनंतर जुलै 2024 मध्ये संघर्षक्षेत्रातील 10 बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले.
- मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांना 410 सौर दिवे आणि 410 लंबुंचे (टेन्ट) वाटप करण्यात आले आहेत.
- शिरुर आणि मंचर बनपरिक्षेत्रातील एकूण 50 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून जुत्रर वनविभाग हा राज्यातील पहिला वनविभाग झालेला आहे.
- वनविभागातील 233 अतिसंवेदनशील गावांना "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" घोषित करण्यात आलंय.
- डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत असून आतापर्यंत 150 घरांना सौर उर्जा कुंपण बसवण्यात आले असून आणखी 550 घरांना कुंपणाद्वारे सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे.
- विभागात एकूण 400 पिंजरे कार्यान्वित आहेत.
- वनविभागामार्फत 400 आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
- नागरिकांना 3 हजार 300 नेक गार्डचे वाटप, 5 ठिकाणी अनायडर्स मशीन कार्यान्वित आहेत.
बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन 4 बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे, असेही श्री. डुडी म्हणाले.