
आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान होत आहे. तर दुसरीकडे पंढरपूर मध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत मंडप उभारण्याच्या कामाला गती आली आहे. आज पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे वारीमार्गावर भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मात्र अशाही परिस्थिती हरिनामाचा जयघोष करीत भाविक पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनात साठवून एक एक पाऊल टाकत असतात.
पावसाचा धोका लक्षात घेता पंढरपूर संस्थानने मोठी तयारी सुरू केली आहे. तब्बल दोनशे किलोमीटरहून अधिक पायी प्रवास करून येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पहिल्यांदाच ही मोठी तयारी करण्यात आली आहे. पंढरपुरात प्रथमच पंचवीस हजार इतकी क्षमता असणारा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप मंदिर समितीने उभा केला आहे. 400 फूट लांब तर 100 फूट रुंद इतका मोठा दर्शन मंडप पहिल्यांदाच पंढरीत उभा राहिला आहे. त्यामुळे सहाजिकच यंदा पंढरपुरात वारकरी भक्तांचे विठ्ठल दर्शन हे जलद गतीने पूर्ण होणार आहे.
नक्की वाचा - Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक
पंढरपुरात कशी असेल सोय?
यंदा प्रथमच ४०० फूट लांब आणि १०० फूट रूंद इतका मोठा क्षमतेचा वॉटरप्रुफ दर्शन मंडप उभा करण्यात आला आहे. पांडुरंगाच्या पदस्पर्श दर्शनासाठीच्या या रांगेत २५ हजार प्रेक्षक उभे राहू शकतात. मंडपाची उंची जास्त आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होणार नाही. याशिवाय रांगेत उभे असताना भाविकांना पाणी आणि चहाची सोय करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world