पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले आहे. पण त्याचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील मुखेडमध्ये ढगफुटी झाली आहे. मुखेड आणि मुक्राबादचा परिसर यामुळे बाधित झाला आहे. या भागात तब्बल 206 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस म्हणजे ढगफुटी म्हटले जाते. यापावसाने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला अजून तब्बल 800 गावांना याचा फटका बसला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. इथं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. शिवाय सैन्याला ही मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यात पूर स्थिती आहे. पण सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या विक्रमाबाद भागाला बसला आहे. इथं तब्बल 206 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या ढगफूटीत पाच लोक बेपत्ता झाले आहे. त्याच बरोबर 150 जनावरं वाहून गेली आहेत. अनेक गावामध्ये लोकं अडकून पडले आहेत. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी बचाव कार्यही सुरू केले आहे. मात्र तिथली परिस्थिती पाहाता सैन्याला ही पाचारण करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
याच परिसरातील रावणगावला सर्वात जास्त फटका बसला आहे. या गावात अडकलेल्या 226 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या शिवाय अन्य शेजारच्या 4 गावातून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या ढगफुटीमुळे जवळपास 800 गावं बाधीत झाली आहे. तर 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तातडीनची मदत देण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांना निधी ही उपलब्ध करून देण्यात आल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.