
राज्यात पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याकडून 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान अति अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. या दरम्यान समुद्राची स्थिती खवळलेली असेल. समुद्रात ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती संबंधीताना कळविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून खेड शहरातील जगबुडी नदीचे पाणी खेड - दापोली रस्त्यावर आल्याने खेड शहरांतून दापोलीकडे जाणारी वाहतूक सुरक्षास्तव बंद करण्यात आली होती. जिल्हा प्रशासना मार्फत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 28075 क्युसेक्स तसेच यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून पेनगंगा नदीपात्रात 544666 क्युसेक इतका विसर्ग सूरू आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world