महाविकास आघाडी स्थापन केल्यापासून आणि शिवसेना (उबाठा) पक्षाने आपली भूमिका अधिक व्यापक केल्यानंतर सभाजी ब्रिगेडनेही शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला होता. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने युतीही केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाजी ब्रिगेडचे मुंबईतील पदाधिकारी शिवसेनेवर नाराज झाले आहेत. कुर्ला विधानसभा मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे हे पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा: एका चुकीमुळे लोकसभेला संधी हुकली, कोर्टाने चूक सुधारली, दंडही ठोठावला
संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
"माननीय महोदय, सहस्नेह जय जिजाऊ
मी मराठा समाजाच्या वतीने पत्र लिहित असून आपणांस कळवण्यात खेद होत आहे की, आपल्या पक्षाच्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांना संभाव्य उमेदवारी घोषित केली असून आता मराठा समाजात अत्यंत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. माजी नगरसेविका प्रविणा मनीष मोरजकर यांनी त्यांच्या नगरसेविकेच्या कार्यकाळात मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे नेहरूनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असून, अॅट्रॉसिटी सारख्या कलमांचा चुकीचा वापर करून मराठा समाजाला बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे.
प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजाच्या लोकांवर दाखल केलेल्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी असून अशा व्यक्तीला कुर्ला विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आपण पाहत असल्याची बातमी समोर आल्याने मराठा समाज प्रचंड दुखावला आहे. मराठा समाजाला खोट्या अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्हयांमध्ये अडकवून त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये अशी आमची कळकळीची विनंती असून, या प्रकरणात आपण दखल घेऊन, आपणा समोर हा विषय भेटून मांडण्यासाठी संधी द्यावी ही."
नक्की वाचा : 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं', तर रश्मी ठाकरे... गोगावलेंचं मोठं वक्तव्य
प्रवीणा मोरजकर यांना कुर्ला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या त्या संभाव्य उमेदवार असतील असे बोलले जात आहे. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी विनंती शिवसेना (उबाठा) चे मित्र असलेल्या संभाजी ब्रिगेडने केल्याने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.