चीनमध्ये जनावरांनीही खायला नाकारलं, अन् सांगलीतून राज्यभरात विकलं; मोठ्या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli News : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावात चीनमधून आयात करण्यात आलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बेदाणा प्रोसेसिंग युनिटवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने धाड टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना सुरू असलेल्या या बोगस कारभारामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चोरोची येथील सीमेवर अजित पाटील (भोसे) तीर्थणकर बेदाणा प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी बेकायदेशीररित्या बेदाण्यावर प्रक्रिया सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे, चीनमध्ये जो बेदाणा जनावरांना खाण्यासाठीही अयोग्य मानला जातो, असा निकृष्ट बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणला जात आहे. या बेदाण्याचे पॅकिंग अफगाणिस्तानच्या ट्रेडमार्कखाली करून तो भारतीय बाजारपेठेत खपवला जात असल्याचे उघड झाले आहे. या निकृष्ट बेदाण्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि विजापूर परिसरातील उच्च दर्जाच्या भारतीय बेदाण्याचे दर कोसळले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : कलिंगडावरील चाट मसाल्याने घात केला? 'ती' पावडर पोटात कशी गेली? पायधुनी प्रकरणाचं गूढ उलगडेना!

भेसयुक्त बेदाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका

"चीनचा हा निकृष्ट बेदाणा अत्यंत कमी दरात विकला जातो, ज्यामुळे आमच्या कष्टाने पिकवलेल्या दर्जेदार बेदाण्याला भाव मिळेनासा झाला आहे. आम्ही जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु केवळ जुजबी कारवाई केली जाते. ठोस पावले न उचलल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी व्यक्त केली. या बेदाण्याला कसलीही चव नसून तो भेसळयुक्त आहे. अशा बेदाण्यामुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. ज्या भागात बेदाणा तयार होतो, नेमक्या त्याच ठिकाणी हा आयात केलेला माल आणून व्यापाऱ्यांमार्फत विकला जातो. हा बेदाणा देशात येतोच कसा? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील, असा इशारा त्यांनी दिला.