Satara News : पाणी हे जीवन आहे! मात्र हेच पाणी जर तुमच्या जीवावर उठलं तर? साताऱ्यात सध्या मोठा प्रश्न उद्भवला आहे. एका तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून हे भयाण वास्तव मांडलं आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. परिणामी महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली यांसारख्या प्रमुख भागांमध्ये आणि कर्नाटकातील बेळगावीमध्ये पाण्याच्या गुणवत्तेत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. यामागे औद्योगिक कंपन्यांमधून निघणारं सांडपाणी आणि प्रक्रिया न केलेले शहरी सांडपाणी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
कृष्णेला वाचवा...
ऋतूराज वीर २१ या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तरुणाने कृष्णा नदीची भयंकर परिस्थिती मांडली. हे तरुण कराडहून साताऱ्यापर्यंत टप्प्याटप्प्याने थांबत कृष्णा नदीच्या प्रदूषण मार्गाचा माग काढत साताऱ्यातील संगम माऊलीपर्यंत पोहोचली. येथे वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. वेण्णा नदीतून येणारं पाणी स्वच्छ तर कृष्णा नदीतून येणारं पाणी अत्यंत हिरव्या रंगाचं प्रदूषित असल्याचं या तरुणांना दिसलं. सातारा जिल्ह्यात ८ आमदार आणि २ खासदार आहे. त्यांनी कृष्णा नदी स्वच्छ करण्यासाठी पाठपुरावा करा अशी मागणी केली आहे.
साताऱ्यातील लाखो नागरिकांचा जीव धोक्यात?
कृष्णा नदीतील पाणी शेतीसाठी वापरलं जातं. कृष्णा आणि तिच्या उपनद्यांवर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मोठ्या भागात शेती होते. मात्र कृष्णेची भीषण अवस्था पाहता त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय पशू-पक्षी कृष्णेच्या पाण्यावर आपली गुजराण करतात.