सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News: दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा प्रवास आज (सोमवार) प्रवाशांसह जमिनीवरील नागरिकांसाठीही काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. खराब हवामानामुळे शिर्डी विमानतळावर उतरण्यात अडथळा आल्याने IGO 619Y या विमानाला बराच वेळ हवेत घिरट्या घालाव्या लागल्या. विशेषतः वैजापूर परिसरात हे विमान अतिशय खालच्या पातळीवरून उडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर हे विमान सुरतच्या दिशेने वळवण्यात आले असून, परिस्थिती निवळल्यानंतर ते पुन्हा शिर्डीकडे झेपावणार आहे.
नेमकं काय घडलं?
इंडिगो कंपनीचे IGO 619Y हे विमान नियोजित वेळेनुसार दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. शिर्डी विमानतळाच्या जवळ पोहोचल्यानंतर पायलटने लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र कमी दृश्यमानतेमुळे (Low Visibility) सुरक्षित उतरणे अशक्य झाले. त्यानंतर या विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळाशी संपर्क साधला. त्यावेळी विमानाला वैजापूर परिसरातील आकाशात 'होल्ड'वर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही वेळात हवामान सुधारेल या आशेने विमान हवेतच घिरट्या घालत राहिले.

नागरिकांमध्ये भीती आणि धावपळ
विमान हवेत घिरट्या घालत असताना ते जमिनीपासून अगदी कमी उंचीवर असल्याने वैजापूरमधील नागरिकांची घाबरगुंडी उडाली. विमानाचा आवाज आणि त्याची उंची पाहून काहीतरी अघटित घडते की काय, अशी शंका स्थानिकांना आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाशी संपर्क साधला.

विमानतळ प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि तांत्रिक कारणास्तव विमान हवेत असल्याचे स्पष्ट केले. दृश्यमानता कमी असल्याने विमान लँड होऊ शकत नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इंधन भरण्यासाठी विमान सुरतच्या दिशेने
बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही शिर्डीतील हवामानात सुधारणा झाली नाही. त्यातच विमानातील इंधन कमी होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन पायलटने सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान सुरत विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेतला. सध्या हे विमान सुरतमध्ये सुखरूप उतरले असून तिथे इंधन भरण्याचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इंधन भरल्यानंतर आणि शिर्डीतील हवामान लँडिंगसाठी अनुकूल झाल्यानंतर हे विमान पुन्हा एकदा शिर्डीच्या दिशेने उड्डाण करेल.
या संपूर्ण प्रकारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचणार असल्याने प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे. शिर्डी विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. काही वेळातच हवामान स्वच्छ होण्याची चिन्हे असून त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग पार पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आणि प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world