साजन ढाबे, प्रतिनिधी
Washim News : वाशीम जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांना यंदाच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यास दिल्लीतील लाल किल्ल्यावर विशेष आमंत्रण मिळाले आहे. राज्यातील फक्त 17 जिल्ह्यांतील निवडक सरपंचांना मिळालेल्या या सन्मानात वाशीम जिल्ह्याच्या एकमेव माननीय प्रतिनिधी म्हणून ढोरखेडाच्या सरपंच निवडल्या गेल्या आहेत. हे आमंत्रण ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडून देण्यात आले असून, सुनीता मिटकरी यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची ही मोठी दखल मानली जात आहे.
सुनीता दत्तात्रय मिटकरी गेल्या दहा वर्षांपासून ढोरखेडा गावात सरपंच पदावर काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक उल्लेखनीय बदल घडवून आणले गेले आहेत. गोदरी मुक्ती मोहिमेपासून सुरुवात करून स्वच्छता मोहीम, सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत सौर दिवे बसविणे, गावात सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती आणि नवीन रस्ते बांधणे, तसेच 24 तास सातत्याने पाणीपुरवठा सुनिश्चित करणे या कामांमुळे गावाचा विकास झपाट्याने झाला आहे.
शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला गेला असून सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक पिठगिरणी, तंटामुक्ती यांसारख्या सुविधाही गावात राबविल्या गेल्या आहेत. शाळा आणि अंगणवाडी यासाठी सुधारणांची कामे केली गेली असून व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी आणि त्यासंबंधित सुविधाही गावात राबविण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा - Success Story : परीक्षेला जाताना मोठा अपघात, तरीही मानली नाही हार! आज आहेत देशातील सर्वात तरुण IPS अधिकारी
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुनीता मिटकरी यांनी उमेद आणि महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोती अभियानांतर्गत विविध लघुउद्योग सुरू केले आहेत. या उपक्रमांमुळे गावातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. या यशस्वी कार्यामुळे ढोरखेडा गावाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडून दिलेल्या या विशेष आमंत्रणाला सुनीता मिटकरी यांनी अभिमानाने स्वीकारले असून, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यास लाल किल्ल्यावर सहभागी होण्याचा गौरव लाभल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या निमित्ताने त्यांनी आपल्या गावातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि ग्रामविकासासाठी आणखी प्रामाणिकपणे काम करण्याचं आश्वासन दिलं आहे. या निमित्ताने ढोरखेडा ग्रामपंचायत आणि वाशीम जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या यशस्वी कामाची झलक राज्यभरात दिसून येत असून, महिलांच्या नेतृत्वात गावाचा विकास कसा होऊ शकतो याचा हा उत्कृष्ट नमुना ठरतो आहे.