Mumbai MNS- Shivsena Rally News: दिल्लीमधील जंतरमंतरवर मैदानात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजनामा दिला. या विजयानंतर देशभरातील तरुणाईने मोठा जल्लोष केला. दिल्लीमधील तरुणांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ठाकरे बंधुंनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी तिरंगा रॅली आयोजित केली. या रॅलीला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"आज केवळ मी आपले अभिनंदन नाही करत तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेले नाही पण अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत. ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात आपण सर्व जात, धर्म न पाहता सहभागी झालात. मी कालचं म्हटलेलं आहे. एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे.हा खरा विष्णुचा अवतार आहे," असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नितीन गडकरींवर निशाणा, आता इथेनॉलचा मुद्दा पेटणार!
तसेच "मला मोदींजींना सांगायचं आहे आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत त्यांना सांगा आतातरी देशाकडे लक्ष द्या. आपल्या केंद्रीय अर्थमंत्री महागाईवर बोलत नाही, पण पेपरफुटीचे फायदे काय आहेत, त्यावर बोलतात. राजनाथ संरक्षण मंत्री, देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डामंत्री, रस्तामंत्री ते इथेनॉलवरती बोलत आहेत. हा या पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलत आहेत ते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींवर थेट निशाणा साधला.
दरम्यान, मोदींनी पाहिलं, मत चोरी करता येते पण माणसे चोरी करता येत नाहीत. मने चोरी करता येत नाहीत. ही मने आता पेटलेली आहेत. पिसाळलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणे आपल्या सर्वांचं काम आहे.खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी देशाच्या इतिहासातील एक सुवर्णपान लिहलेलं आहे. तुमच्या शक्तीची नोंद देशाच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी तरुणाईचे कौतुक केले.