रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Political News Today : ठाणे महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने भाकरी फिरवली. ठाण्यात मोठा संघटनात्मक निर्णय घेत पक्षाची जवळपास 100 सदस्यांची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. दरम्यान, लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर इनकमिंग करून तसेच जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी, पक्षाला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागले. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संघटनात्मक पातळीवर मरगळ आली होती.
नक्की वाचा >> CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..
सर्व सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष तथा पालिका गटनेते नजीब मुल्ला यांनी चार दिवसांपूर्वी शहरातील विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले. लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
नक्की वाचा >> CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..
नजीब मुल्ला काय म्हणाले?
नजीब मुल्ला यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचा कानमंत्र बैठकीत दिला. “स्थानिक पातळीवर पक्षसंघटन वाढवा, आगामी निवडणुकांसाठी स्वतःला प्रबळ दावेदार म्हणून सिद्ध करा. पक्षाकडून आवश्यक ते सर्व पाठबळ दिले जाईल,” असे त्यांनी सांगितले. या भूमिकेला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुल्ला यांनी नमूद केले. यावेळी माजी खासदार तथा पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेही उपस्थित होते.