CM Devendra Fadnavis Latest Statement : जेव्हा राज्यातील नारीशक्तीचा आपण विचार करतो,तेव्हा सरकारची अत्यंत महत्त्वकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना..या योजनेवर जितकी टीका झाली, तितकाच त्याला प्रतिसादही मिळाला.तुमचं सरकार येण्यामध्येच सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरली ती लाडक्या बहिणीची असं निरीक्षण तज्ज्ञानं नोंदवलेलं आहे.तुम्हाला काय वाटतं ही योजना सरकारच्या गेल्या दीड वर्षांच्या काळात किती यशस्वी ठरलेली आहे. यापुढे या योजनेचा पुढचा टप्पा काय असेल?,या प्रश्नाचं उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"मला असं वाटतं हे खरंच आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे,ती आमच्या सरकारची एक यशस्वी योजना आहे.विशेषत: महिलांमध्ये आपल्याला एक अधिकार प्राप्त झाला,अशा प्रकारची एक भावना यामुळे तयार झाली.वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांनी त्यासंदर्भात आपली भूमिका मांडली.काही महिलांनी असं सांगितलं की,आम्ही घरगुती काम करत होतो. त्यामुळे आम्हाला घरात पाहिजे त्या प्रमाणात जो एक मान मिळाला पाहिजे,तो मान मिळाला पाहिजे होता.पण जेव्हापासून लाडक्या बहिणीचे पैसे यायला लागले,तर घरातही आमचा मान वाढला,असं अनेक महिलांनी सांगितलं,असं फडणवीस म्हणाले.
नक्की वाचा >> NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल'
महिलांच्या सन्मानाशी जोडलेली आणि महिलांना बळ देणारी योजना
फडणवीस पुढे म्हणाले,"काही महिलांनी याचा उपयोग करून आपला छोटासा व्यवसाय उभा केला.त्यातून त्या पुढे गेल्या. मध्यंतरीच्या काळात मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून आम्ही एक योजना काढली की, शासनाच्या अनेक योजनांशी त्याला जोडलं. त्यातून इंटरेस्ट सब्सिडी त्या योजनेतून घ्यायची आणि कर्जाचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिण योजनेतून घ्यायचा.असं करून जवळपास 5 लाख महिलांना व्यवसायाकरीता एक लाख दीड लाख रूपये कर्ज उपलब्ध करून त्यांना आपण व्यवसाय उघडून दिला".
"मला असं वाटतं की, ही योजना केवळ कोणाला पैसे देण्यापुरती मर्यादीत नाही आहे. तर महिलांच्या सन्मानाशी जोडलेली आणि महिलांना बळ देणारी, अशाप्रकारची योजना आहे.म्हणून मला असं वाटतं की, निश्चितपणे या योजनेचं यश तर आहेच.केवळ महिलांना आम्ही 1500 रुपये आता देतोय. पुढे 2100 रुपये देऊ.याच्याने त्यांचं सर्व चांगलं होईल,असं नाहीय.म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की, राज्यात जास्तीत जास्त लखपती दीदी करायच्या. मला सांगताना असं वाटतं की, जवळपास आम्ही आता 50 लाखांचा टप्पा गाठत आहोत.आमच्या राज्यातील 50 लाख बहिणी या लथपती दीदी झालेल्या आहेत.एक दोन लाख इकडे तिकडे असतील",असंही फडणवीस म्हणाले.