जाहिरात

NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल'

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वाईट आहे. राज्य आर्थिक तुटीत आहे असं ही त्यायावेळी आवर्जून म्हणाल्या.

NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल'
  • नारी शक्ती विधेयकाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कधीही विरोध केला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
  • महाराष्ट्र महिलांना आरक्षण देणारे पहिले राज्य होते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
  • पुणे राज्याचा क्राईम कॅपिटल बनल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

NDTV Marathi Manch: इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला कधी ही विरोध नाही. ते आमचं विधेयक आहे. आमच्या सरकार वेळी ते विधेयक आणलं गेलं होतं. अशी स्पष्ट भूमीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.  'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्लेव्हची थीम 'नारी शक्ती महाराष्ट्राची' अशी होती. त्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमीका स्पष्ट केलं. त्या पुढे म्हणाल्या की महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. शरद पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. असं असताना नारी शक्ती विधेयकाला आम्ही का विरोध करू असा प्रश्न ही त्यांनी केला. शिवाय आमचा या विधेयकाला विरोध काल ही नव्हता. आज ही नाही असं ही त्या यावेळी म्हणाल्या. 

या विधेयकाबाबत त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या. या विधेयकात मतदार संघ पुनर्रचनेचा मुद्दा जोडला गेला. आम्ही या विधेयकाबाबत काही प्रश्न सरकारकडे उपस्थित केले होते. ते  पारदर्शक पणे आम्हाला सांगावे अशी आमची अपेक्षा होती. आम्हाला सांगितलं गेलं होतं की प्रत्येक राज्यात पन्नास टक्के लोकसभेच्या जागा वाढणार. महाराष्ट्रात लोकसभेच्या  48  जागा आहेत. पन्नास टक्के प्रमाणे 24 जागा वाढणार होत्या. म्हणजेच 72 खासदार महाराष्ट्रात झाले असते. हा फॉर्म्यूला देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र विधेयकामध्ये त्याचा समावेशच केला गेला नव्हता. अशा स्थितीत लोकसंख्ये प्रमाणे मतदार संघ पुनर्रचना झाली असती तर दक्षिणेकडच्या राज्यांवर अन्याय झाला असता. आम्हाला जो प्रस्ताव दिला होता तो विधेयकात आलाच नाही. त्यामुळे ते विधेयक पडले असं स्पष्ट पणे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आमचं समर्थन नारी शक्ती विधेयकाला आहे. आमचे मतभेद कुठे आहेत, प्रत्येक राज्यात पन्नास टक्के  जागा वाढवू असं सरकारने आम्हाला सांगितलं होतं. पण तसं बिलात नव्हतं. आम्हाला सांगितलं एक विधेयकात आणलं दुसरं असा आरोप ही त्यांनी यावेळी केला. 

नक्की वाचा - NDTV Marathi Manch Live: पुणे ही महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झालीय, सुप्रिया सुळेंचा आरोप

सुप्रिया सुळे यांनी पुढे पुण्याच्या स्थितीबाबत ही वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या की पुणे हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल होत आहे.  महाराष्ट्राच्या पोलीसांचा आपल्याला अभिमान आहे. पण त्यांच्या मागे ज्या अदृष्य शक्ती आहेत, त्यावर माझा आक्षेप आहे.  केंद्रातल्या गृहमंत्र्यांचा डेटा सांगतो, की देशात क्राईममध्ये पाचव्या क्रमांक पुणे आहे. आज पुणे राज्याचं क्राईम कॅपिटल झाली आहे. त्यामुळे त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला लाज वाटते असा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केला.  याला जबाबदार पुण्याचे कारभारी आहेत असा आरोप ही त्यांनी केला. त्यामुळे पुण्याच्या कारभाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवा अशी मागणी त्यांनी या निमित्ताने केली. जसं  वेब सिरीजमध्ये चालतं तसं पुण्यात सध्या क्राईम बाबत सुरू आहे असं ही त्या म्हणाल्या. दरम्यान विलिनिकरणाची आशा नाही. आता पुढे जायचं आहे. मी इतिहासात रमत नाही. आज आणि उद्याचं मी पाहाते. मी पुढे गेली आहे असं म्हणत त्यांनी विलिनिकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. 

यावेळी त्यांनी भाजपवर ही सडकून टिका केली. भाजप म्हणत होते काँग्रेस मुक्त भारत करू. आमच्या विरोधात रान उठवलं. पण भाजपला आमच्याच नेत्यांना त्यांच्या पक्षात घ्यावे लागत आहेत. नेते तेच आहेत फक्त चिन्ह बदलली आहेत हाच तो काय बदल झाला आहे.  भाजपने काँग्रेसमुक्त केल्यानंतर काही नवीन नेते तयार करतील असं आम्हाला वाटत होतं. पण 12 वर्षात त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच लोक दमदाटी करून त्यांच्या पक्षात घ्यावे लागत आहेत. असं होत असेल तर मला चिंता वाटते, भाजपकडे टॅलेंटचं नव्हतं का? असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला. निवडणुकांमध्ये यश आणि अपयश सर्वांच्याच आयुष्यात येतं. म्हणून काय घरी बसायचं का असा प्रश्न त्यांनी केला. या देशात टॅलेंट भरपूर आहे. आम्ही नवे नेते तयार करू. 12 वर्षा आम्हाला अपयश आलं. पण 70 वर्षे आम्ही सतेत होतो हे ही विसरून चालणार नाही. आम्ही एका विचारधारे सोबत आहोत. शेवट पर्यंत राहू असं ही त्यांनी सांगितलं. इंडिया आघाडी भक्कम आहे. डीएमके आजही आमच्यासोबत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय आठ तारखेला इंडिया आघाडीची बैठक होत असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.   

लाडकी बहीण योजनेत काय सत्यता आहे हे ही त्यांनी या निमित्ताने सांगितलं. लाडकी बहीण योजनेचा सर्व डेटा मी आणला आहे असं त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेत निवडणुकी आधी 2 कोटी 46 लाख महिलांना पहिल्यांदा पैसे दिले गेले. त्यानंतर आता 1 कोटी 66 लाख महिलांना पैसे दिले गेले. 80 लाख महिला वगळल्या गेल्या. पण वेबसाईटवर 1 कोटी 12 लाख महिलांनाच योजनेचे पैसे दिले गेले. म्हणजे  1 कोटी 25 महिला कमी झाल्या आहेत. हा महाराष्ट्र सरकारचा वेबसाईटवरचा डेटा आहे. असं सांगत त्यांनी या योजनेचे भविष्य काय असेल हे सांगितलं. शिवाय ई केवायसीच्या नावावर अनेक महिलांची नावं कट केली जात आहे असं ही त्या म्हणाल्या. जर या अपात्र महिला असतील तर त्यांना आधी जे पैसे दिले गेले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वाईट आहे. राज्य आर्थिक तुटीत आहे असं ही त्यायावेळी आवर्जून म्हणाल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com