दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला जोरदार धक्का दिल्लीकरांनी दिला. केजरीवाल यांच्या दहा वर्षाच्या सत्तेला धक्का मिळाला. सत्तेतून त्यांना बाहेर व्हावे लागले. ऐवढेच नाही तर मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांना ही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मनिष सिसोदीया हे ही पराभूत झाले. मात्र विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी मात्र काठावर विजय मिळवला. या पराभवानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य केला आहे. जनतेचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे. दिल्लीत आप सरकारने वीज, शिक्षण, पाणी क्षेत्रात चांगले काम केले. दिल्लीतल्या लोकांना चांगल्या सुविधा दिल्या. दिल्लीत चांगल्या पायाभूत सुविधा उभारल्या. दिल्लीकरांचे जिवन सुकर होण्यासाठी प्रयत्न केला. आता या पुढे एक भक्कम विरोधीपक्ष म्हणून काम करणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य असल्याचं ही ते म्हणाले.
या पुढच्या काळात जनतेसाठी काम करत राहाणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. आम्ही राजकारणात सत्तेसाठी कधीच आलो नव्हतो. सत्ता एक साधन होती, ज्या माध्यमातून आम्हाला जनतेची सेवा करायची होती. त्यांच्या सुख दुखात आम्ही सहभागी होवू शकलो. आता या पुढेही जनतेसाठी काम करू. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढले. त्यांना शुभेच्छा देतो असंही ते म्हणाले. कार्यकर्त्यांना भरपूर काही सहन करावं लागलं असंही ते म्हणाले.
एकीकडे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया हे दिग्गज पराभूत झाले. अशा वेळी विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी निसटता विजय मिळवला. त्यांनी विजयानंतर कालकाजी मतदार संघातील जनतेचे आभार मानले. बाहुबल, गुंडागर्दी, हाणामारी याचा सामना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना करावा लागला. तरीही आम्ही लढलो आणि जनतेपर्यंत पोहोचलो. आम्ही जनादेश स्विकारत आहे. आता लढाईची वेळ आहे. आम्ही भाजपच्या गुंडागिरी विरुद्ध लढत राहू अशी प्रतिक्रीया आतिशी यांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Parvesh Varma : अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा?
दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 47 जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टी 23 चा आकडा गाठू शकली आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही आपलं खातं उघडता आलं नाही. भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग या विजयामुळे मोकळा झाला आहे. हरियाणा, महाराष्ट्र त्यानंतर दिल्लीवरही भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.