जाहिरात

'काले कौवे से डरियो…किती काळ हवेत बाण सोडणार?' राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं चोख उत्तर

Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : राहुल गांधी यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचीच आकडेवारी काढली त्यावर मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं.

'काले कौवे से डरियो…किती काळ हवेत बाण सोडणार?' राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं चोख उत्तर
Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
मुंबई:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी 

Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : लोकसभा निवडणूक 2024 आणि विधानसभा निवडणूक 2024 या दरम्यान फक्त पाच महिन्यांचा फरक होता. पण, या कालावधीमध्ये मतदार भरमसाठ कसे वाढले? या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांची माळ लावली आहे. आज (मंगळवार, 24 जून 2025) तर राहुल गांधी यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचीच आकडेवारी काढली आणि फक्त पाच महिन्यात तब्बल 8 टक्क्यांनी मतदार कसे वाढले? असा सवाल केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राहुल गांधींचा सवाल काय?

  • राहुल गांधी यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित करताना म्हंटलं की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या मतदारांची संख्या पाच महिन्यात आठ टक्क्यांनी वाढली
  • काही निवडणूक केंद्रांवर 20 ते 50 टक्क्यांनी मतदार वाढले होते. अनेक अज्ञातांनी मतदान केल्याची माहिती पोलिंग एजंट्सनी दिली होती. मीडियानेही अनेक विनापत्त्याच्या मतदारांचा पर्दाफाश केला आहे
  • पण तरीही निवडणूक आयोग गप्प? हे साटंलोटं आहे का? हे वेगवेगळे घोटाळे नाहीत, ही मतांची चोरी आहे. आणि लपवालपवी ही कबुली आहे. म्हणूनच आम्ही डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत आहोत.

( नक्की वाचा : Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांचा अजित पवारांना टोला, 40 वर्षांचा इतिहास सांगितला )

मुख्यमंत्र्यांचं उत्तर 

राहुल गांधी यांनी फडणवीसांच्या मतदारसंघावरच अशी शंका घेतल्यानंतर खुद्द फडणवीसांनीच द्विट करुन उत्तर दिलं. त्यांनी हे उत्तर देत असताना आकडेवारीही मांडली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राहुल गांधी, महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवाचे तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे खरे आहे. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? तसे तुमच्या माहितीसाठी, महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत.  जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 8% पेक्षा जास्त मतदार वाढले आहेत. यामधील अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

हे मतदारसंघ कोणते आहेत? तिथे किती टक्के मतदार वाढले? आणि तिथे कोण जिंकलं? याची जंत्रीच मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे

मुख्यमंत्र्यांच्याच नागपूर जिल्ह्यात पश्चिम नागपूरमध्ये 7 टक्के मतदान वाढलं तिथं काँग्रेसचे विलास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूरमध्ये 7 टक्के मतदान वाढलं. तिथंही काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी विजय मिळवला. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीमध्ये 10 टक्के मतदान वाढलं. वडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रे,स शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मुंबईतील मालाड पश्चिममध्ये 11 टक्के मतदान वाढलं. तिथं काँग्रेसचे अस्लम शेख आणि ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा मतदारसंघात 9 टक्के मतदान वाढलं तिथं राष्ट्रवादी काँग्रे,स शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. 

राहुल गांधींनी सांगितलेले पाच टप्पे कोणते?

दोन आठवड्यांपूर्वी राहुल गांधी यानी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत पाच टप्प्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारा लेख लिहिला होता. त्यातले पाच टप्पे कोणते होते बघा

  1. सरकारने निवडणूक आयुक्त निवडीचं पॅनेलच बदललं
  2. भाजपने बनावट मतदारनोंदणीने मतदार यादी फुगवली
  3. संध्याकाळी पाच नंतरच्या मतदानात फुगवटा आढळला
  4. बोगस मतदान भाजपलाच होईल याची काळजी घेतली
  5. निवडणूक घोटाळ्यातल्या पुराव्यांचा माग मिटवले गेले

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने नियमांमध्ये बदत करत. ज्या निवडणुकांना 45 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा निवडणुकीतले सीसीटीव्ही फुटेज, वेबकास्टिंग आणि सीडीआर डिलीट करण्याचे आदेश दिले होते. ज्या मतदारसंघातल्या निकालाबद्दल आक्षेप किंवा याचिका दाखत करण्यात आलेल्या नाहीत. अशा ठिकाणच्या मतदानाचे सगळे पुरावे निष्ट केले जाणार आहेत. अशा प्रकारच्या व्हिडीओंचा वापर करुन, गैरसमज पसरवल्याची उदाहरणे समोर आल्यानं, हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांनी 10 सवाल विचारले होते.

  1. निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं?
  2. त्रिसदस्यीय समितीत सत्ताधारी पक्षाचे दोन सदस्य ठेवून विरोधकांना बाद का केलं?
  3. 31 लाख मतदार वाढायला पाच वर्ष, 41 लाख मतदार वाढायला फक्त पाच महिने?
  4. महाराष्ट्रातील फक्त 12000 मतदान केंद्रावरच मतदार कसे वाढले?
  5. महाराष्ट्रात पाच वाजल्यानंतर 7.86% मतदान कसं वाढलं?
  6. महाराष्ट्रात पाच वाजल्यानंतर 76 लाख मतदारांनी मतदान कसं केलं?
  7. भाजपला अडचणीच्या 85 मतदारसंघातच मतदान कसं वाढलं?
  8. वाढलेल्या मतदारांची फोटोसहित यादी द्यायला आयोगाचा नकार का?
  9. मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला निवडणूक आयोगाचा नकार का?
  10. मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला कायद्याने बंदी का आणली?


राहुल गांधींच्या या सवालांना उत्तर देणारा लेख दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी लिहिला होता. आजही राहुल गांधींचं द्विट येताच देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीसह उत्तर दिलं. राज्यातील विधानसभा  निवडणुकीला अजून एक वर्ष व्हायचंय आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये या कथित फिक्सिंगवरुन सामना संपत नाहीये

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com