MNS Morcha : राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांकडून टाळी, 5 तारखेच्या मोर्च्याबाबत मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राज्यातील शालेय अभ्यासक्रमात होणाऱ्या हिंदींच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी काढणार असल्याची घोषणा केली आहे. या मोर्च्याला सर्वांनी मराठीच्या मुद्यावर एकत्र यावं असं आवाहन राज यांनी केलं होतं. या आवाहानाला प्रतिसाद देत राज यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं मोर्च्यात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षापाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंही या मोर्च्याला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शरद पवारांच्या पक्षाची भूमिका काय?

जयंत पाटील यांनी या पत्रात म्हंटले आहे की,  महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचं स्पष्ट धोरण आहे.

महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार 'हिंदी सक्ती'साठी हट्ट धरून बसलं आहे.

( नक्की वाचा : Hindi Language Controversy : ठाकरे बंधू एकत्र येणार, पण मोर्च्याची वेळ आणि ठिकाण बदलणार? कसा निघणार तोडगा? )

खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविधं भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. आणि, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे असे स्पष्ट करताना त्यांनी  शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा पाटील यांनी दिला. 

Advertisement

महाराष्ट्र सरकारच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020)' अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, 5 जुलै 2025 रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. 

( नक्की वाचा : Hindi Language Controversy : ठाकरेंकडून टाळी मिळाल्यानंतर मनसेचा काँग्रेसकडं हात! नवा ट्विस्ट येणार? )

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणूनच, मी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, येत्या 5 जुलैच्या मोर्चात प्रचंड संख्येने आवर्जून सहभागी व्हा.