- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे
- पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे
- सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. यात त्यांनी अनेक घोषणा केल्या. पण अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यांनी दिलेला शब्द या अर्थसंकल्पात पाळला आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे. ज्या घोषणेची प्रतिक्षा होती ती शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. कर्ज माफी करताना जे शेतकरी नियमित कर्ज भरत होते त्यांनाही विशेष लाभ देण्यात येणार असल्याचं फडणवीसंनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर कर्ज माफी योजना जाहीर केली. या योजनेनुसार जे पात्र शेतकरी आहे त्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात आली आहे सप्टेबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा समजला पाहीजे. या कर्जमाफीची शेतकऱ्यांनी प्रतिक्षा होता. एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फडणवीसांनी दिलासा दिला आहे.
कर्ज घेतलेले अनेक शेतकरी हे नियमित कर्ज भरत आहेत. अशा वेळी एकीकडे कर्जमाफी करताना दुसरीकडे अशा शेतकऱ्यांचा ही विचार या अर्थसंकल्पात केला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान या कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन केली होती अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी योजना जाहीर करतोय असं ते यावेळी म्हणाले.
राज्यातील बँकींग यंत्रणा सक्षम असावी यासाठी शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे असं ते म्हणाले. समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या कर्जमाफीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणुकीनंतर लगेच ही कर्जमाफी होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ती कर्जमाफी आता करण्यात आली आहे. त्याचा लाभ राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world