शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेला. पण त्यातले अनेक नेते, आमदार, मंत्री हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. जरी ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असले तरी त्यांनी ठाकरे यांच्या बरोबरचा संवाद काही तोडलेला नाही. याची स्पष्ट कबूली एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यानेच दिली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका जाहीर सभे दरम्यान या मंत्र्यांने आपण उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे या मंत्र्याची येणाऱ्या काळात अडचण वाढणार का याकडेच राजकीय वर्तूळाचं लक्ष लागलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले गेले. त्या प्रगतीपुस्तकात संजय राठोड नापास. पण मी कधी परीक्षा दिली नाही. कुणी पेपरही तपासले नाहीत. मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये केले. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत संजय राठोड बोलत होते. त्यावेळी त्यांनी समाज बांधवां बरोबर बंजारा भाषेत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितलं होतं, संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही. मी तुम्हाला नापास करेन असं वक्तव्य राठोड यांनी केलं आहे. पुढे ते बोलतना म्हणाले मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत. मला उद्धव ठाकरे यांचे आजही फोन येतात. आमच्या दोघांमध्ये आजही संवाद आहे. आम्ही दोघे ही एकमेकां बरोबर बोलतो असं संजय राठोड यावेळी म्हणाले. त्यामुळे सर्वच जण आवाक झाले.
भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. मात्र त्यांनी घुमजाव केलं. मी असे बोललोच नाही असे राठोड यावेळी म्हणाले. संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या ही मंत्रिमंडळात मंत्री होते. पुजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राठोड यांनी शिंदे यांना साथ दिली. शिवाय त्यांना कॅबिनेट मंत्री ही करण्यात आलं. नव्या महायुती सरकारमध्ये त्यांचा पत्ता कट होईल असं वाटत होतं. पण त्यांनी सर्वांचे अंदाज चुकवले. आता त्यांच्या यावक्तव्यामुळे त्याचे पडसाद काय उमटतात ते पहावे लागले.