Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे त्यांचा शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगाला फटका बसला आहे. अमोल कोल्हे यांचा आजपासून नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांचा आजचा प्रयोग रद्द करण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशेष म्हणजे भाजप नेते गोपाळ पाटील यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं होतं. सोशल मीडियावर वक्फ कायदा आणि पहलगामवरील कोल्हे यांना ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे आयोजक भाजप नेते गोपाळ पाटील यांनी एक्झिट घेतली. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांचं ट्रोलिंग झाल्यामुळे त्यांच्या महानाट्याच्या तिकीट विक्रीवर परिणाम झाला होता. एक कलाकार म्हणून प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडली जात असल्याने कोल्हे यांनी खंत व्यक्त केली होती. दरम्यान उद्या 1 मेपासून महानाट्याचे 4 प्रयोग होणार असून नाशिकमधील दानशूर व्यक्तींनी अमोल कोल्हेंना मदत केल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - देवाच्या धावा करतानाच मंदिरातील भिंत कोसळली, 8 भाविकांचा मृत्यू, जखमींची संख्या चिंता वाढवणारी
प्रयोग रद्द केल्यानंतर काय म्हणाले अमोल कोल्हे?
एका पोर्टलने मी पहलगाममध्ये केलेलं वक्तव्य अर्धवट दाखवलं. पहलगामची घटना निषेधार्हच आहे. अतिरेक्यांनी जाणीवपूर्वक धर्माबाबत प्रश्न विचारला का? पाकिस्तानची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. अतिरेक्यांनी षड्यंत्र रचले आहे का? असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केला. अशावेळी राष्ट्रधर्म म्हणून एकत्र येणं गरजेचे आहे. दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणं आवश्यक आहे. त्यांना अद्दल घडवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
अमोल कोल्हेंचं ते वक्तव्य...
पहलगाममधील दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केलं. मात्र यावेळी हिंदी पट्ट्यातील अनेक न्यूज चॅनलमध्ये एक हेडलाइन चालवली जात होती. 'जाती नही धर्म पुछ कर मारा'. त्या दिवशी रात्रभर झोप लागली नाही, तळमळत होतो. स्वत:ला बुद्धिवंत म्हणवणाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरदेखील हे वाक्य होतं. दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जितकं नुकसान केलं नव्हतं, त्यापेक्षा जास्त या एका वाक्याने माझ्या देशाचं नुकसान करायला सुरुवात केली होती. हा विचार आम्ही कधी करणार आहोत की नाही.
दहशतवाद्यांनी कदाचित एका धुव्रीकरण होत असलेल्या देशावर अचूक ठिकाणी मारा केला का? या देशात ध्रुवीकरण पेटलं आहे, विखार वाढला असताना एका गोळीने एक माणूस मरेल, पण एका वाक्याने किती घरं पेटतील याचा विचार करून ही घटना घडली का? या सर्व प्रश्नांनंतर विषय राहतो तो या सर्व संकटांचा देश म्हणून आपण कशाप्रकारे सामना करणार आहोत?