शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला रायगड जिल्ह्यातला वाद शमताना दिसत नाही. मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याचा विषय बाहेर काढत तटकरेंना लक्ष्य केलं आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशाच तसे उत्तर दिले आहे. रायगडतल्या 'थ्री इडियट्स' मधल्या एका 'इडियट्स' ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली आहे. त्या 'इडियट्स' ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध तटकरे हा संघर्ष रंगताना दिसणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगड जिल्हा पालकमंत्री पदासाठी हपापलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे अशा शब्दात आनंद परांजपे यांनी जोरदार टीका केली आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचे कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरलेले नाही. मात्र दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. परंतु सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी बाहेर काढावी असे खुले आव्हान आनंद परांजपे यांनी दिले आहे आहे. भरत गोगावले यांची गुन्हेगार प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढणार असल्याचा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या 'थ्री इडियट' कडून राहिलेला आहे, असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला. विधानसभेत सुनिल तटकरे यांनी युती धर्माचे पालन केले. युती धर्माचे पालन केले नसते तर मात्र भरत गोगावले काय अजून दोन उमेदवार पडले असते असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर होती. त्यावेळी मतदारसंघात केलेल्या आपल्या कामाच्या जोरावर सुनिल तटकरे हे निवडून आले आहेत.मात्र हे 'थ्री इडीयट्स' बेछूट आरोप करत आहेत असेही आनंद परांजपे यावेळी म्हणाले.
दरम्यान गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली राजकारणात वर आणले त्याच्यावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. मी देखील शिवसेनेत काम केले आहे.रश्मी ठाकरे या कुटुंबवत्सल आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीच हस्तक्षेप नसायचा असे सांगतानाच जिल्हा परिषद सभापती, आमदार ही ओळख तुम्हाला कुणी दिली.? जर शिवसेनेने मोठे केले आणि अशा वेळेस रश्मी वहिनीवर आरोप करत असाल तर ते दुर्दैव आहे अशा शब्दात आनंद परांजपे यांनी खडेबोल सुनावले आहेत.
दरम्यान भरत गोगावले यांनी ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी जो काही भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे तो काढावा. त्यांनी जर ते सिद्ध केले तर मंत्रीपदाचाच काय आमदारकीचा ही राजीनामा देण्याची आपली तयारी आहे असं भरत गोगावलेयांनी स्पष्ट केलं आहे. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाहीत तर आनंद परांजपे स्वत:चं तोंड काळ करून घेतील का असे प्रति आव्हान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला या निमित्ताने दिले आहे.