Pawan Kalyan : ती रात्र ते आजचा दिवस; आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं 'वादळ'

पवन कल्याण खऱ्या अर्थाने वादळासारखेच आंध्र प्रदेशाच्या राजकारणात आले. या वादळाचा फटका वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना बसला.

Advertisement
Read Time: 4 mins

ये पवन नहीं आंधी है... नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत केलेलं हे वक्तव्य चर्चेत होते. या वक्तव्या पेक्षाही ज्या व्यक्तीसाठी हे वक्तव्य केलं ती खास होती. तेलुगू सिनेसृष्टीतील मेगास्टार आणि आता आंध्र प्रदेशच्या राजकारणातील मोठं नाव पवन कल्याणसाठी नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं  होतं. 

पवन कल्याण खऱ्या अर्थाने वादळेसारखेच आंध्र प्रदेशाच्या राजकारणात आले आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सत्ता उलथवली. चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी, पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि भाजपने एकत्रित निवडणूक येथे लढली. 

आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने 175 पैकी 135 जागा जिंकल्या. जनसेना पक्षाने 21 जागा जिंकल्या. तर सत्तेत असलेल्या वायएसआर काँग्रेसला केवळ 11 जागा जिंकता आल्या. तर टीडीपीने लोकसभेच्या 16 जागा जिंकल्या तर जनसेना पक्षाने 2 जागा जिंकल्या. 

जनसेना पक्षाचा 100 टक्के स्ट्राईक रेट

चंद्राबाबू नायडु यांच्या टीपीडीने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचा हा विजय खास होता. कारण त्यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के होता. म्हणजे पवन कल्याण यांच्या पक्षाने जेवढ्या जागा लढल्या तेवढ्या जागा जिंकल्या. त्यामुळे आंध्र प्रदेशच नाही तर देशाच्या राजकारणातही पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाची दखल घेतली गेली.

Advertisement

पवन कल्याण यांचा राजकीय प्रवास

कल्याण यांनी 2008 मध्ये त्यांचे भाऊ चिरंजीवी याच्या प्रजा राज्यम पक्षाची युवा शाखा युवाराज्यमचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. मात्र 2009 मध्ये एका रोड शो दरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्याने ते आजारी पडले. त्यानंतर त्यांनी राजकारणातून ब्रेक घेतला. 

राजकारणातील दीर्घ ब्रेकनंतर पवन कल्याण यांनी 14 मार्च 2014 रोजी आपल्या जनसेना पक्षाची स्थापना केली. 2014 मध्ये, 'काँग्रेस हटवा, देश वाचवा' या घोषणेसह आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि भाजप युतीसाठी त्यांनी प्रचार केला. त्यानंतर 2019 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्यांनी डाव्या पक्षांसोबत युती केली आणि दोन जागांवर निवडणूक लढवली. यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी पवन कल्याण यांचं राजकारणात काही होणार नाही, अशी चर्चा सुरु झाली. 

Advertisement

मात्र त्यानंतर पवन कल्याणने आपला गियर बदलून न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेत असलेल्या वायएसआर काँग्रेसला टार्गेट केलं.  सरकारविरोधात अनेक आंदोलने केली. लोकांच्या प्रश्नासाठी 'जनवाणी' कार्यक्रम सुरु केला. चंद्राबाबू नायडू यांनीही वेळोवेळी पवन कल्याण यांची साथ दिली. 

ती रात्र आणि वारं फिरलं

एन चंद्राबाबू नायडू यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात सप्टेंबर 2023 मध्ये अटक झाल्यानंतर आंध्र प्रदेशात पवन कल्याण जबरदस्त अॅक्टिव्ह झाले. चंद्राबाबू यांच्या अटकेविरोधात पवन कल्याण रस्त्यावर उतरले. मोठा गाड्यांचा ताफा घेऊन ते रात्रीच विजयवाडा येथे चंद्राबाबू नायडू यांना भेटण्यासाठी निघाले. मात्र वाटेतच त्यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी अडवले. यावेळी पवन कल्याण यांनी रस्त्यावर झोपून याचा निषेध देखील केला. त्या रात्रीनंतर पवन कल्याण सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर तुटून पडले.

Advertisement

Pawan kalyan
Photo Credit: Photo - ANI

वायएसआर काँग्रेसविरुद्धच्या लढतीत पवन कल्याण यांनी भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला. टीडीपी, जनसेना पक्ष आणि भाजपने एकत्र येण्याचं आवाहन पवन कल्याण यांनी केलं. पवन कल्याण यांच्याशी युती करण्यासाठी भाजपने फारशी उत्सुकता त्यावेळी दाखवली नव्हती. तरीही पवन कल्याण आपलं काम करत राहिले. अखेर मार्चमध्ये अधिकृत युतीनंतर पवन कल्याण यांनी पायाला भिंगरी लावून अख्खं राज्य पिंजून काढलं. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला. 

पवन कल्याण यांची पांढळा पायजमा कुर्त्याची स्टाईल, भाषणशैली, सभेला संबोधित करण्याची पद्धत, गर्दीत उत्साह भरण्याची ताकद त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. पवन कल्याण यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होणार नाही, असं विरोधक बोलत राहिले, मात्र पवन कल्याण यांनी विरोधकांना खोटं ठरवलं आणि जे करायचं ते करुन दाखवलं. पवन कल्याण यांच्या राजकीय कारकीर्दीची ही सुरुवातच म्हणावी लागेल. आंध्र प्रदेश आणि देशाच्या राजकारणात पवन कल्याण यांची जादू पुढे कशी चालणार हे येणारा काळच ठरवेल.   

पवन कल्याण यांची संपत्ती

पवन कल्याण यांची पत्नी आणि 4 मुलांकडे 163 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2019 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 56 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. म्हणजेच पवन कल्याण यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पवन कल्याण यांच्याकडे आलिशान घर आणि आलिशान कार देखील आहेत.

Topics mentioned in this article