अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅराथॉन मुलाखत घेतली. ही मुलाखत जवळपास तीन तास चालली. या मुलाखतीत मोदींनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी गोधरा हत्याकांडाबाबत ही काही खुलासे केले आहेत. शिवाय लोकशाही, आरएसएस, टीकाकार, यांच्याबाबतही त्यांनी आपली मतं मांडली आहेत. पण गोधरा दंगलीबाबत ते मोकळे पणाने बोलले. त्यांची ही मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
27 फेब्रुवारी 2002 साली कारसेवक असलेल्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली होती. त्यात महिला आणि लहान मुलांसह 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवाला लागला होता. ही एक अकल्पनीय दुर्घटना होती असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी आम्ही विधानसभेत होतो. आमदार होवून आपल्याला केवळ तीन दिवस झाले होते. त्याच वेळी ही घटना घडली. लोकांना जिवंत जाळलं गेलं होतं असं मोदी म्हणाले.
गोधरा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. ही दंगल आतापर्यंतची सर्वात मोठी दंगल असल्याचं सांगितलं गेलं. पण हे चुकीचं होतं असं मोदी म्हणाले. 2002 आधीचे आकडे पाहीले तर गुजरातमध्ये सतत दंगली या होत होत्या. कुठे ना कुठे कर्फ्यू लावला जायचा. पतंग उडवण्याची स्पर्धा असो की सायकलमध्ये झालेली टक्कर असो अशा छोट्या गोष्टी वरून दंगली होत होत्या. 2002 च्या आधी गुजरातमध्ये जवळपा 250 पेक्षा जास्त दंगली झाल्या होत्या अशी माहिती ही मोदी यांनी दिली. 1969 साली झालेली दंगल तर सहा महिने चालली होती, असं ते यावेळी म्हणाले.
त्यामुळे गुजरातचा मुख्यमंत्री होण्या आधी पासून गुजरातमध्ये दंगलीचा इतिहास राहीला आहे. गोधरामध्ये जे काही झालं ते चुकीचं झालं. काहींनी हिंसा केली. त्यावेळी केंद्रात आमच्या विरोधातील सरकार होतं. त्यांनी आमच्या सरकारवर आरोप लावले. पण आम्हाला न्याय देवतेने न्याय दिला. आमचे सरकार निर्दोष ठरले, असं ही मोदी म्हणाले. त्यानंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल झाली नाही. यासाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभारही मानले.
दरम्यान लोकशाहीत टीका ही महत्वाची असते असंही ते म्हणाले. "मी टीकेचे स्वागत करतो, कारण माझी अशी खात्री आहे की टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे. जर तुम्ही खरे लोकशाहीवादी असाल, तर टीका सहन केली पाहीजे. 'निंदक नियरे राखिये, म्हणजेच टीका करणारा तुमच्या शेजारी असावा. तसं असेल तर तुम्ही चांगलं काम करू शकता, मला वाटतं टीका झाली पाहिजे, पण माझी तक्रार आहे की आजकाल टीका होत नाही. असंही यावेळी मोदी म्हणाले.