- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्रिपद मिळवण्याची शक्यता आहे
- फडणवीस केंद्रात गेले तर राज्यातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदासाठी संधी मिळेल
- शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असे स्पष्ट केले आहे
भारतीय जनता पक्षात आगामी काळात मोठा उलफेर होण्याची दाट शक्यता आहे. त्या शक्यतेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील असं एका बड्या नेत्याने सांगितलं आहे. केंद्रात फडणवीसांकडे अर्थ खातं दिलं जाण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे. फडणवीस जर केंद्रात गेले तर राज्याची धुरा महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले जाईल. पुढचे मुख्यमंत्री हे बावनकुळे असतील असं भाकीत खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा कधी ही मुख्यमंत्री होवू शकणार नाहीत असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बानवकुळे हे मुख्यमंत्री होतील हे आपलं आकलन आणि अंदाज आहे. त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो असं सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याची सुत्रे येतील असं राऊत म्हणाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते आहेत असं मला नेहमी दिसत आलं आहे. ते सगळ्यांशी संवाद ठेवतात. ते सर्वांना सांभाळून घेतात. मात्र फडणवीसांनंतर एकनाथ शिंदे हे परत मुख्यमंत्री होणार नाहीत असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे त्यांना पुढे संधी नाही. फडणवीस हे केंद्रात मंत्री होतील. त्यांनी तर पंतप्रधान व्हाव ते ही 2029 च्या आधी असं ही ते म्हणाले. फडणवीस केंद्रात गेले तर तेच बावनकुळेंच्या नावाची शिफारस करतील असं ही राऊत यांनी सांगितलं.
20 तारखेला संसदेचा अधिवेशन सुरू होईल. त्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यात गुणवत्तेवर आधारीतच मंत्रिपद दिली जाणार नाही. ते दिवस आता संपले आहेत. ज्यांच्या गळ्यात मोदी शहां यांनी पट्टा बांधला त्यांच्या समोर मंत्रीपदाची हाडकं टाकली जातील अशी टिका ही त्यांनी केली. त्यात मग मिंधे गटाचे असतील किंवा आमच्यातून फुटून गेलेले असतील. त्यामुळे कोणात्या तोंडात मंत्रीपदाचे हाडूक टाकलं जातं ते ही येणाऱ्या काळात पाहायला मिळेल असं ही राऊत यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते फोडाफोडीत व्यस्त आहेत. ते प्रचंड पैसा भ्रष्टाचार करून मिळवत आहेत. मिसिंग लिंकमधून ही असाच पैसा गोळा केला असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यांनी काही केलं तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्रात अनेकांची मंत्रीपदं जाणार आहेत. त्यात अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री बदलले जाणारा असल्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांना ही नारळ दिला जाणार असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तूळात आहे. फडणवीस यांना ही बोलावलं जाणार आहे. तसं असेल तर त्यांनी 2029 च्या आधी पंतप्रधान व्हावं. त्याचा मराठी माणसाला आनंदच होईल. आमच्या त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहे. पण त्यांनी हे 2029 आधी करावं असं ही राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर केंद्रात मोदी शहा यांची सत्ता नसेल असं भाकीत ही त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे ज्या काही हलचाली करायच्या आहेत त्या फडणवीसांनी आताच कराव्यात असंही ते म्हणाले.