
लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप करण्यात आला त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याचा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत खरतर त्यांना मंत्री करायला हवं होते पण आता एकच मंत्री पद राहिले असल्याने दलितांचा मतांचा विचार करता त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा मंत्री करा अशी मागणी आठवले यांनी केली आहे. शिवाय त्यांनी झटका आणि हलाल वादावर वक्तव्य करत मंत्री नितेश राणे यांना चिमटे काढले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटन विका असा मुद्दा मांडला आहे. यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्या ने करा. पण नितेश राणे एवढी हार्ड भूमिका घेऊ नका असा सल्ला देखील आठवले यांनी दिला आहे. मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व धर्म समभाव असला पाहीजे. संविधानाचा विचार करता मी नितेश राणे यांचा भूमिकेशी सहमत नसल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा असं सांगितले आहे. यावर बोलताना रामदास आठवले यांनी ही चांगली गोष्ट असल्याचे सांगत, मी देखील माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो जय भीम आणि जय भारत म्हणा. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना लोकांनी जास्त वाचू नये. जास्त वाचले की डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे वाद निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील टीका ही चुकीची आणि मूर्खपणाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा काँग्रेस पक्षाने लपवून ठेवला. काँग्रेसकडून शिवरायांची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याची टीका मंत्री शिवेंद्रसिहराजे यांनी केली होती, हे म्हणणे योग्यच असल्याचं आठवलेंनी सांगितलं.त्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. छावा चित्रपटातून हा इतिहास आता पुढे येत आहे असं ही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते, या नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोलताना रामदास आठवले यांनी नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे असल्याचं सांगितलं. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख हे मुस्लिम होते असे पुरावे पुढे आलेले आहेत असंही आठवले म्हणाले. अनेक शूर मुसलमान हे मुघलांच्या विरोधात लढलेले असं ही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world