राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेटाच्या बातम्या जोर धरत आहेत. अशा वेळी शिंदे सेना पुन्हा सक्रिय झालेल्याची दिसत आहे. शिंदे सेनेच्या टार्गेटवर फक्त आदित्य किंवा उद्धव ठाकरेच नाही तर आता रश्मी ठाकरेही असल्याचं समोर आलं आहे. रश्मी ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली असा गौप्यस्फोट शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. शिवाय त्या पक्षाच्या कारभारात ढवळाढवळ करतात, असा गंभीर आरोप ही भरत गोगावले यांनी केला आहे. गोगावले यांच्या या आरोपाने ठाकरे सेनेत मात्र एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भरत गोगावले यांचा हा आरोप म्हणजे थेट रश्मी ठाकरे यांच्यावरच हल्ला केल्या सारखे आहे. शिवाय शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे नाही तर रश्मी ठाकरे यांचेच चालत होते. शिवसेना रश्मी ठाकरे चालवत होत्या. त्यांच्या इशाऱ्यावर उद्धव ठाकरे निर्णय घेत होते असं ही एक प्रकारे गागावले यांनी सुचित केलं आहे. यावर आता ठाकरे सेनेनं ही उत्तर दिलं आहे. भरत गोगावलेंना रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप महिला म्हणून पचलेला दिसत नाही. असं ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. कारण महिलांचा हस्तक्षेप लिमिटेड असावा असं त्यांनी वक्तव्य केलं आहे असं ही त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे रश्मी ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरे कसे बरे होते, पण रश्मी ठाकरेंमुळे ते काही करु शकले नाहीत असा चालुपणा गोगावले करतायत असं ही त्या म्हणाल्या.
शिवसेना का फुटली याची कारणं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी सांगितली जातात. रश्मी ठाकरेंनीच शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न सध्या शिंदे गट करताना दिसत आहे. गोगावले त्यात आघाडीवर आहेत. पहिल्यापासूनच ते जरा जास्त बोलतात. पण त्यांच्या आरोपांना, टीकेला मात्र इतर नेते साथ देताना दिसत नाहीत. छगन भुजबळांनी तर गोगावलेंच्या आरोपापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. शिवाय शिवसेना का फुटली हे आपल्याला माहित नाही असं ही ते म्हणाले. तर गोगावलेंना ही माहिती कुठून मिळाली याबाबत आपण त्यांना विचारणा करू असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. ज्या ज्यावेळेस ठाकरे कुटुंबावर एखादं संकट येतं त्यावेळेस कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र येताना दिसतात. त्यावर रश्मी ठाकरेंचा प्रभाव दिसून येतोच. मंत्रीपदासाठी बायकोच्या आत्महत्येची धमकी देणारे नेते रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपाची तक्रार करतायत.राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा थेट फटका शिंदेसेनेला आणि भाजपला होऊ शकतो. त्यातल्या त्यात मुंबईत ठाकरे ब्रँड वरचढ होऊ शकतो. नाशिक, ठाणे, पुण्यातही चित्र ठाकरेंच्या बाजूनं जाऊ शकतो. त्यासाठी महत्वाचं आहे ते मनसे-ठाकरे सेना एकत्र येणं. त्यासाठी महत्वाची भूमिका आहे ती रश्मी ठाकरेंची. म्हणूनच कदाचित शिंदे सेना रश्मी ठाकरेंना टार्गेट करताना दिसत आहे अशी चर्चा आहे.