- महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे
- संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नावाची चर्चा केली होती
- पण आदित्य ठाकरे यांनी शिवसेना मोठा पक्ष असल्यामुळे पहिला क्लेम शिवसेनेचा असल्याचे म्हटले होते
महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून एक जण सहज विजयी होवू शकतो. या जागेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा होती. तसे संकेत ही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले होते. पण त्यांच्या यावक्तव्याला आमदार आदित्य ठाकरे यांनीच खो देत शिवसेना मोठा पक्ष आहे त्यामुळे पहिला क्लेम हा शिवसेनेचा असेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता संजय राऊत यांना युटर्न घ्यावा लागला आहे. त्यांच्या नव्या वक्तव्याने शरद पवारांसाठी राज्यसभेचा पेपर जड जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
संजय राऊतांनी यु-टर्न घेतल्याने शरद पवारांसाठी राज्यसभा दुरच असल्याची सध्याची स्थिती निर्माण झाली आहे. ठाकरेंचा हा नवा डाव राजकीय वर्तूळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले माझी आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका वेगळी नाही. आमचा पक्ष हा 20 आमदारांचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेस आहे. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे जो निवडून जाणार आहे तो खासदार मविआचाच जाईल. आदित्य ठाकरे जे बोलले ते चुकीचं नाही असं ही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यसभेवर जाण्याची शरद पवार यांची इच्छा आहे. मी तसं म्हणालो होतो. ते ज्येष्ठ नेते आहेत, मविआचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र बसत निर्णय घेऊ. शिवसेना सर्वात मोठं पक्ष आहे. अशात पहिला अधिकार हा आमचाच आहे असं ही राऊत म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरे जे काही बोलले ते योग्यच बोलले. ते चुकीचं बोलणार नाहीत. राज्यसभेसाठी 37 मतांचा कोटा आहे. त्यात 10-12 मतं जास्त राहतील असं दिसत आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मतांची बेरीज करावी लागेल. जे लगेच शक्य नाही असं ही राऊत यावेळी म्हणाले.
शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाली नाही असं ही राऊत म्हणाले. प्रत्यक्ष उमेदवार अर्ज भरल्यावर सर्व गोष्टी लक्षात येतील. एकत्र बसून आम्ही निर्णय घेवू असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारी वरून संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही हे अजून ही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे जर शरद पवार राज्यसभेवर गेले नाहीत तर त्यांच्या संसदीय राजकारणात खंड पडणार आहे. असं पहिल्यांदाच होईल की शरद पवार हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.