शरद पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद, केंद्रात मंत्रीपद, लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. पण त्यांना देशाच्या पंतप्रधानपदाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. आता पुन्हा एकदा शरद पवार आणि पंतप्रधानपद याची चर्चा होत आहे. माजी केंद्रीय गृह मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी याबाबत एक किस्सा सांगितला आहे. त्यात त्यांनी शरद पवारांनी पंतप्रधानपदाची संधी कशी दवडली हेच सांगितले आहे. त्यावेळी दिल्लीत काय काय घडामोडी घडल्या होत्या हे त्यांनी सविस्तर सांगितले. सुशिलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्यात चांगले संबध होते. राज्यातील राजकारणानंतर दोघेही केंद्रात सक्रीय झाले. दोघेही काँग्रेसमध्ये होते. नरसिंहरावांकडे त्यावेळी काँग्रेसची सुत्र होती. त्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा याची चर्चा सुरू होती. त्याच वेळी शरद पवारांनी आपले नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवले होते. याची आठवण यावेळी शिंदे यांनी सांगितली. शिवाय मंत्रिमंडळात कोण कोण असावे याची यादीही आम्ही दोघांनीच तयार केली होती. ती यादी घेवून नरसिंहरावांकडे आपण गेलो होते.
मात्र नरसिंहरावांच्या मनात काय सुरू होते याचा अंदाज आपल्याला येत नव्हता. ज्या वेळी नरसिंहरावांना मंत्रिमंडळाची यादी देण्यात आली त्यावेळी त्यांनी मला विचारले होते की शिंदे तुम्हाला राज्याच्या राजकारणात जायचे आहे का? त्या वेळी आपण माझ्या ऐवजी शरद पवारांना मुख्यमंत्री करा असे सांगितले होते. त्यानंतर नरसिंहरावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी जर ही ऑफर शरद पवारांनी नाकारली असती तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान झाले असते असे वक्तव्य सुशिलकुमार शिंदे यांनी केले. मात्र जे नशिबात असते तेच होते. त्याच्या पुढे काही करता येत नाही असेही शिंदे म्हणाले.
आपल्याला राजकारणात शरद पवारांनीच आणले. जर त्यांनी आपल्याला राजकारणात आणले नसते तर पोलिस खात्यात सॅलूट मारत राहीलो असतो याच स्पष्ट कबूली सुशिलकुमार शिंदे यांनी यावेळी दिली. शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच आपण राजकारणाचे धडे घेतले असंही ते म्हणाले. शरद पवारांना पदावरून हटवाले यासाठी ज्या आमदारांनी सह्या केल्या होत्या त्या मी पण होतो. विलासराव देशमुख यांच्या सांगण्यावरून आपण ही सही केली होती. पण आपण सही केली आहे यावर कधीच शरद पवारांनी विश्वास ठेवला नाही. पण विलासरावांबरोबर असलेल्या संबधामुळे आपण ती सही केली होती असे ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा
शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पण त्यांनी कधीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ये असे सांगितले नाही. त्यांनी नेहमीच विचारांचा आदर केला. यशवंतरावां प्रमाणेच शरद पवारांकडे दुरदृष्टी आहे असेही ते म्हणाले. ज्यावेळी लोकसभेचा नेता म्हणून निवडलो गेलो त्यावेळी मनमोहनसिंग यांच्या बाजूला बसत होतो. शरद पवार चौथ्या बाकावर बसायचे. त्यावेळी नेहमीच दबाव जाणवायचा याची कबूली शिंदे यांनी दिली. शिवाय राजकारणात आणल्याबद्दल पवारांचे यावेळी शिंदे यांनी आभारही मानले.