महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) बंधू एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सूचक वक्तव्य केलं आहे. तसंच कार्यकर्तेही वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याची वाट पाहात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले ठाकरे?
'महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. (मनसैनिक) मनातही कोणताही संभ्रम नाही. आम्ही संदेश न देता थेट बातमी देऊ', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरु आहे. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मनसेकडूनही सकारात्मक प्रतिसाद
यापूर्वी संदीप देशपांडे, अमित ठाकरे आणि आता अविनाश जाधव या मनसेच्या बड्या नेत्यांकडून मनसे-शिवसेना युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केली होती. महाराष्ट्र हितासमोर आमचे वाद, भांडणे छोटी आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल आम्ही पुढची पावलं उचलली पाहिजेत, तर उद्धव साहेबांनी राज साहेबांना फोन करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयार आहोत., असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं होतं.
( नक्की वाचा : ठाकरे गटाची नवी खेळी, गुलाबराव पाटलांना शह देण्यासाठी कट्टर विरोधकाला मोठी जबाबदारी )
अमित ठाकरे काय म्हणाले?
'आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. दोन्ही भावांनी एकत्र यावे की नाही हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल. पुढाकार कोणीही घ्यावा. मात्र मी घेऊ शकत नाही.' असं मोठं वक्तय राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी केलं होतं.