कोण आहेत सुवेंदु अधिकारी? ममता दीदींच्या पश्चिम बंगालमधील साम्राज्याला धक्का लावणाऱ्या दादांची राजकीय कारकीर्द

Bengal Election Result 2026 News: ज्याने 34 वर्षांची डाव्यांची राजवट उलथवून लावली, त्याच 'दादा'ने आता ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला ढासळला! नंदीग्राममध्ये दीदींना हरवणारे सुवेंदु अधिकारी बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार का? वाचा त्यांचा थक्क करणारा प्रवास.

जाहिरात
Read Time: 5 mins
"West Bengal Election Results 2026 Suvendu Adhikari: कोण आहेत सुवेंदु अधिकारी?"

West Bengal Election Result 2026 News: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार आहे, भाजपच्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांचं तब्बल 15 वर्षांचं वर्चस्व ढासळले. बंगालमध्ये महाविजयासाठी भाजपला एका खंबीर स्थानिक नेत्याची गरज होती आणि ममता बॅनर्जींचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू शिलेदार शुभेंदु अधिकारी यांना आपल्या गोटात सामील करून ती उणीव भरून काढली गेली. तृणमूल काँग्रेसची (TMC) निवडणूक रणनीती अचूक माहीत असलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी संदेशखाली, आरजीकर मेडिकल कॉलेज प्रकरण आणि उलबेरिया-हावडा येथील दुर्गा पूजा हिंसाचारासारख्या मुद्यांवरून ममता बॅनर्जींना चौफेर घेरण्यात कोणतीही कसर सोडली नाही. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी संपूर्ण पश्चिम बंगाल पिंजून काढला. काँग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या अधिकारी यांनी 1998 मध्ये ममतांसोबतच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुवेंदु अधिकारी अविवाहित असून ते ब्राह्मण समाजातील आहेत. जाणून घेऊया त्यांचा प्रामाणिकपणापासून ते बंडखोरीपर्यंतचा प्रवास... 

राजकीय वारसा आणि सुरुवातीचा काळ

सुवेंदु अधिकारी यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूरमधील कांथी येथील एका समृद्ध राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे बंगालच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आहे. मेदिनीपूर क्षेत्रावर अनेक दशकांपासून अधिकारी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. सुवेंदु यांनी राजकारणाचे पहिले धडे त्यांच्याकडूनच गिरवले. वर्ष 1989 मध्ये काँग्रेसच्या छात्र परिषदेतून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्या काळात बंगालमध्ये डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व होते,अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचा विद्यार्थी नेता म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. वर्ष 1995 मध्ये कांथी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची अधिकृतरित्या सुरुवात केली.

Advertisement

नंदीग्राम आणि जननेत्याचा उदय

ममता बॅनर्जी यांनी वर्ष 1998 मध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेसची (TMC) स्थापना केली, तेव्हा सुवेंदु अधिकारी आणि त्यांचे कुटुंब ममता यांच्याशी जोडले गेले. पण सुवेंदु यांच्या आयुष्याला खरे वळण वर्ष 2007 मध्ये मिळाले. जेव्हा तत्कालीन डाव्या सरकारने नंदीग्राममध्ये 'केमिकल हब' बनवण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला. त्या काळी डावे सरकार इतके शक्तिशाली होते की त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. पण तिथेच सुवेंदु अधिकारी यांनी ती कामगिरी केली, ज्यामुळे त्यांची प्रतिमा एका सामान्य नेत्यावरून जननेता अशी झाली. ममता बॅनर्जी या आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा होत्याच, पण कॅमेऱ्यांच्या मागे नंदीग्रामच्या अरुंद गल्ल्यांमध्ये आणि शेतात खरी लढाई सुवेंदु अधिकारी लढत होते.

नंदीग्राम आंदोलनाचे खरे नायक

जनआंदोलन उभे करणे, लोकांना हिंमत देणे आणि डाव्यांशी थेट दोन हात करण्याचे काम सुवेंदु अधिकारी करत होते. त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करून भूमी उच्छेद प्रतिरोध कमिटी (BUPC) स्थापन केली. सुवेंदु यांची कामाची पद्धत इतर नेत्यांपेक्षा वेगळी होती. ते फक्त रॅलीत भाषण देऊन कोलकाताला परतणारे नेते नव्हते. ते रात्री नंदीग्रामच्या गावांमध्ये मुक्कामाला थांबायचे, लोकांशी त्यांच्याच स्थानिक भाषेत संवाद साधायचे आणि त्यांची भीती दूर करायचे. जिथे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जीवावर लोकांना घाबरवत होते, तिथे सुवेंदु शेतकऱ्यांसाठी ढाल बनले. 14 मार्च 2007च्या पोलीस गोळीबारानंतर जेव्हा संपूर्ण राज्य दहशतीखाली होते, तेव्हा मागे न हटता त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवले. राजकीय तज्ज्ञांच्या मते नंदीग्रामची खरी चावी सुवेंदु यांच्या हातात होती, ज्यामुळे 2011 मध्ये 34 वर्षांच्या डाव्या राजवटीचा अंत झाला.

(नक्की वाचा: Bengal election Result : बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच 'हा' निर्णय लागू होणार; PM मोदींची दिल्लीतून मोठी घोषणा!)

मोदी लाटेतही लोकसभा विजय

वर्ष 2011च्या तृणमूलच्या ऐतिहासिक विजयाने हे सिद्ध केले की, सुवेंदु आता फक्त एक आमदार नसून बंगालच्या राजकारणातील एक मुख्य स्तंभ आहेत. वर्ष 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तमलुक मतदारसंघातून डाव्यांचे दिग्गज नेते लक्ष्मण सेठ यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. वर्ष 2014च्या मोदी लाटेतही त्यांनी आपली ही जागा कायम राखली होती.

सुवेंदु बनले ममतांचे उजवे हात 

प्रशासकीय आणि संघटनात्मक बांधणीसाठी ममतांना सुवेंदु यांची गरज होती. त्यांना राज्य राजकारणात बोलावून परिवहन आणि सिंचन यासारखी महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली. या विभागांच्या माध्यमातून त्यांचा सरकारी यंत्रणेवर प्रभाव वाढला. यादरम्यान त्यांनी मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगल महाल यासारख्या भागातही टीएमसीला मजबूत केले, जिथे पूर्वी विरोधी पक्षांचे वर्चस्व होते. संपूर्ण बंगालमधील कार्यकर्त्यांसाठी ते 'दादा' बनले होते.

Advertisement

पक्षांतर्गत असंतोष

वर्ष 2016 नंतर काही वादांमुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला, पण खरा भूकंप वर्ष 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर आला. भाजपच्या कामगिरीने ममता अस्वस्थ झाल्या आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची एण्ट्री झाली. याच काळात ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांचे पक्षातील वर्चस्व वेगाने वाढले. सुवेंदु यांच्यासारख्या 'ग्राउंड लीडर'ला जाणवू लागले की, पक्षात 'कॉर्पोरेट स्टाइल' हस्तक्षेपामुळे जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहे. हा असंतोष वाढत गेला आणि शेवटी नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला अन् टीएमसीमध्ये खळबळ उडाली. टीएमसीचे वरिष्ठ नेते सौगता रॉय आणि स्वतः प्रशांत किशोर यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले, पण सुवेंदु यांनी आपला मार्ग निश्चित केला होता.

बंडखोरी आणि भाजप प्रवेश

डिसेंबर 2020 मध्ये सुवेंदु यांनी तृणमूल काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला. 20 वर्षांच्या नात्याचा हा शेवट होता. 19 डिसेंबर 2020 रोजी मेदिनीपूरमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा क्षण टीएमसीसाठी हा मोठा धक्का होता, तर भाजपसाठी बंगालच्या सत्तेची दारे उघडण्यासारखे होते. टीएमसीने त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयला घाबरत असल्याचा आरोप केला, तर सुवेंदु  यांनी पक्षाला 'प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' संबोधून आपली नाराजी व्यक्त केली.

Advertisement

(नक्की वाचा: Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी?)

नंदीग्राममध्ये आपल्याच 'गुरू'चा केला पराभव

ममता बॅनर्जी यांनी वर्ष 2021 ची निवडणूक आपली भवानीपूरची सुरक्षित जागा सोडून सुवेंदु यांच्या नंदीग्राम बालेकिल्ल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. हा केवळ निवडणूक मुकाबला नव्हता, तर प्रतिष्ठेचे युद्ध बनले होते. नंदीग्राममध्ये सुवेंदु यांनी ममता बॅनर्जींचा पराभव करून देशाला चकित केले. या विजयामुळे ते रातोरात भाजपचा सर्वात मोठा चेहरा बनले आणि त्यांना विधानसभेचे 'विरोधी पक्षनेते' पद मिळाले. आज सुवेंदु अधिकारी ममता सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, पण त्यांना ते सूडाचे राजकारण मानतात.

सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होतील? 

वादांच्या वलयात असूनही ते बंगालमध्ये भाजपचा सर्वात प्रखर चेहरा आहेत. सुवेंदु आणि ममतांमधील हे राजकीय वैर, "राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो" याचे उत्तम उदाहरण आहे. नंदीग्रामचा हा नायक, ज्याने डाव्यांना पाडले आणि आता ममता बॅनर्जींना आव्हान दिले आहे, ते येणाऱ्या काळात बंगालच्या सत्तेचे समीकरण कसे बदलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.