India vs England 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नागपूरमध्ये झालेला पहिला वन-डे सामना टीम इंडिया 4 विकेट्स आणि तब्बल 68 बॉल्स राखून जिंकला आहे. इंग्लंडनं दिलेलं 249 रन्सचं आव्हान भारतानं विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. शुबमन गिल आणि हर्षित राणा या तरुण खेळाडूंची दमदार कामगिरी त्याला श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या तरुण खेळाडूंनी दिलेली भक्कम साथ हे या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. टीम इंडियाच्या यंगिस्ताननं केलेल्या कामगिरीमुळे भारतानं तीन सामन्यांच्य़ा या वन-डे सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताकडून शुबमन गिलनं सर्वाधिक 87 रन्स केले. गिलला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आलं आहे. या निवडीवर प्रश्न विचारण्यात येत होते. गिलनं या सामन्यात दमदार खेळी करत टिकाकारांना बॅटनं उत्तर दिलं.
यशस्वी जैस्वालच्या समावेशामुळे गिल या मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला होता. यशस्वी आणि रोहित झटपट आऊट झाल्यानं टीम इंडियाची स्थिती अडचणीत आली होती. त्यावेळी गिल आणि श्रेयस अय्यर जोडीनं भारतीय इनिंग सावरली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 रनची पार्टनरशिप केली. श्रेयसनं 36 बॉलमध्ये 59 रन केले.
श्रेयस आऊट झाल्यानंतर गिल आणि अक्षर पटेलनं चौथ्या विकेटसाठी 108 रनची पार्टनरशिप करत टीम इंडियाचा विजय जवळ आणला. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षरनं 47 बॉलमध्ये 52 रन केले.
( नक्की वाचा : IND vs ENG : विराट कोहली पहिल्या वन-डे मध्ये का नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण )
हर्षितचा विक्रम
त्यापूर्वी पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडची संपूर्ण इनिंग 47.4 ओव्हर्समध्ये 248 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून हर्षित राणा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातील पदार्पणाच्या मॅचमध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा हर्षित हा पहिला भारतीय बॉलर बनला आहे.
या सीरिजमधील पुढचा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये होणार आहे.