IPL 2026 : आयपीएल 2026 चा थरार सध्या देशभर सुरू आहे. मैदानात फोर आणि सिक्सचा पाऊस पडत असतानाच, फॅन्सच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की, या खेळाडूंना नक्की पैसे कसे मिळतात? करोडो रुपयांची बोली लागलेले हे खेळाडू जर मैदानात उतरलेच नाहीत किंवा संपूर्ण सीझन बेंचवर बसून राहिले, तर त्यांना ठरलेली रक्कम मिळते का? क्रिकेटच्या या ग्लॅमरस जगात खेळाडूंच्या पगाराचे गणित नेमके कसे असते, याचा हा सविस्तर आढावा.
एकाही सामन्यात संधी न मिळाल्यास काय होते?
अनेकदा असे घडते की, एखाद्या खेळाडूला लिलावात मोठी रक्कम देऊन संघात घेतले जाते, परंतु त्या संघाचे समीकरण असे असते की त्या खेळाडूला एकाही सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळत नाही.
अशा परिस्थितीतही, तो खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असेल आणि तंदुरुस्त असेल, तर त्याला करारात ठरलेली 100 टक्के रक्कम दिली जाते. म्हणजेच, मैदानात न उतरता केवळ बेंचवर बसून राहणाऱ्या खेळाडूलाही त्याचे पूर्ण मानधन मिळते.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
दुखापत झाल्यास पैशांचे गणित कसे असते
जर एखादा खेळाडू स्पर्धेदरम्यान जखमी झाला, तर त्याला त्याचे पूर्ण मानधन दिले जाते. इतकेच नाही तर त्याच्या उपचाराचा सर्व खर्च देखील संबंधित फ्रँचायझी उचलते. एखादा भारतीय खेळाडू जो बीसीसीआयच्या केंद्रीय करारात आहे आणि तो स्पर्धेपूर्वीच राष्ट्रीय कर्तव्यावर असताना जखमी झाला, तर त्याची नुकसान भरपाई बीसीसीआयमार्फत केली जाते.
मात्र, जर एखाद्या परदेशी खेळाडूने स्पर्धेपूर्वी स्वतःहून नाव मागे घेतले, तर संघ त्याला पैसे देण्यास बांधील नसतो आणि अशा वेळी त्या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाते.
मॅच फी आणि नवे नियम
आयपीएल 2025 पासून बीसीसीआयने मानधनाबाबत एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता खेळाडूंना त्यांच्या मूळ कराराच्या रकमेव्यतिरिक्त प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये इतकी स्वतंत्र 'मॅच फी' दिली जाते. याचा अर्थ खेळाडू जितके जास्त सामने खेळेल, तितकी त्याची कमाई वाढत जाते.
एखाद्या परदेशी खेळाडूने लिलावात निवड होऊनही शेवटच्या क्षणी माघार घेतली, तर त्याच्यावर भविष्यातील लिलावासाठी निर्बंध लादले जाऊ शकतात.
करार आणि खेळाडूंची सुरक्षा
आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या टीमने खेळाडूचा करार संपण्यापूर्वीच त्याला संघातून मुक्त (Release) केले, तर त्या खेळाडूला कराराची पूर्ण रक्कम द्यावी लागते. या नियमांमुळे खेळाडूंना आर्थिक सुरक्षा मिळते. त्यामुळेच आयपीएल केवळ खेळासाठीच नाही, तर खेळाडूंवर होणाऱ्या पैशांच्या वर्षावामुळे जगातील सर्वात श्रीमंत लीग मानली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world