BCCI नं वाढवली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी, पुढच्या सिझनमध्ये काय होणार?

Mumbai Indians : भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजसाठी टीम इंडियाची निवड होताच मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या वन-डे आणि T20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) हेड कोच झाल्यानंतर होणारी ही पहिलीच सीरिज आहे. या  टीम निवडीमध्ये गंभीरचा टच जाणवत आहे. गंभीरच्या सल्ल्यानंतर निवड समितीनं आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धांचा विचार करुन टीम निवडली आहे. या टीम निवडीबद्दल फॅन्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबई इंडियन्सची अडचण का?

मुंबई इंडियन्सनं या आयपीएल सिझनपूर्वी मोठा बदल केला. हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केलं. त्याला खरेदी करण्यासाठी टायटन्सला मोठी रक्कम दिली. त्यानंतर मुंबईनं त्यांना पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या रोहित शर्माला दूर करुन हार्दिकला टीमचं कॅप्टन केलं.

हार्दिक पांड्याला कॅप्टन करण्याचे जोरदार पडसाद मुंबई इंडियन्सच्या फॅन्समध्ये उमटले. त्यांनी मैदानात हार्दिकला प्रचंड ट्रोल केलं. हार्दिकला नव्या रोलमध्ये फारसा प्रभाव टाकता आला नाही. मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 मध्ये 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकल्या. मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या नंबरवर फेकली गेली. 

 ( नक्की वाचा :  श्रीलंका सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, 'गंभीर' पर्वातील टीम इंडियाची 5 महत्त्वाची वैशिष्ट्यं )
 

काय बदलली परिस्थिती?

मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला करारबद्ध केलं त्यावेळी हार्दिक टीम इंडियाच्या T20 टीमचा व्हाईस कॅप्टन होता. त्याच्याकडं T20 टीमचा भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जात होतं. टीम इंडियाच्या भावी कॅप्टनमध्ये मुंबईनं मोठी गुंतवणूक केलीय, असं मानलं जात होतं. पण, BCCI नं श्रीलंका विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर करताच यामध्ये नवा ट्विस्ट आलाय.

Advertisement

टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन म्हणून हार्दिकची नाही तर सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आलीय. सूर्या 2026 साली होणाऱ्या T20 वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचा या फॉर्मेटमधील कॅप्टन असेल असं मानलं जात आहे.

( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )
 

सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. मुंबई इंडियन्सकडं रोहितचा उत्तराधिकारी म्हणून सूर्याचा पर्याय असतानाही त्यांनी गुजरातकडून हार्दिकला खरेदी केलं. हार्दिकचा कॅप्टन म्हणून पहिला सिझन निराशाजनक ठरला. त्यातच तो आता टीम इंडियाचाही कॅप्टन नाही. आता हार्दिकच्या कॅप्टनसीमध्ये सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे आजी-माजी T20 कॅप्टन खेळवायचं? की मागील सिझनमधील उलाढाल चुकली हे मान्य करत हार्दिकला कॅप्टनपदावरुन दूर करायचं ही डोकेदुखी मुंबई इंडियन्ससमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये काय होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article