आयपीएल 2025 चे पडघम वाजत आहेत. पुढील सिझनपूर्वी मेगा ऑक्शन होणार हे जवळपास स्पष्ट आहे. या ऑक्शनचं स्वरुप बीसीसीआयनं अद्याप जाहीर केलेलं नाही. पण, त्यापूर्वी क्रिकेट फॅन्स वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. ऋषभ पंतबाबतही एक पोस्ट नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर सुरु झालेल्या चर्चांना स्वत: पंतनं उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय होती पोस्ट?
ऋषभ पंत पुढील आयपीएल सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)टीममध्ये दाखल होऊ शकतो, असा दावा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये करण्यात आला होता. या पोस्टनुसार पंतनं आरसीबीच्या मॅनेजमेंटशी संपर्क केला होता.पण, त्याच्या मागण्या आरसीबीनी फेटाळल्या. कारण, पंत आरसीबीमध्ये येऊ नये अशी विराट कोहलीची इच्छा होती. हा टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्समधील राजकारणाचा भाग आहे. ही पोस्ट पाहून ऋषभ पंत चांगलाच संतापला. त्यानं ही पोस्ट निराधार असल्याचं सांगत रोज हे प्रकार आणखी खराब होत आहेत, असं मत व्यक्त केलं.
( नक्की वाचा : IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video )
काय म्हणाला पंत?
ऋषभ पंतनं त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'फेक न्यूज. तुम्ही या प्रकारच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर का पसरवता? थोडा समजूतदारपणा दाखवा. विनाकारण खोट्या बातम्या पसरवू नका. हे पहिल्यांदा झालेलं नाही. तसंच हे शेवटचं देखील नसेल. काही लिहिण्यापूर्वी तुमच्या कथित सोर्सची पडताळणी करा. हे प्रकार दिवसोंदिवस आणखी खराब होत आहेत. हे फक्त त्याच लोकांसाठी आहे जे चुकीच्या बातम्या पसरवत आहेत.'
ऋषभ पंतचं दमदार कमबॅक
ऋषभ पंतनं तब्बल 634 दिवसांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली होती. तो सध्या कानपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी पंतचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.