भारतात वाहतुकीचे नियम तोडणे, रांगेत मध्येच घुसणे किंवा सार्वजनिक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी अनेकदा पाहायला मिळतात. याच 'सिविक सेन्सच्या' कमतरतेवर दिल्लीत राहणाऱ्या मिताली शर्मा नावाच्या तरुणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विदेशातून 20 दिवसांचा प्रवास करून भारतात परतल्यानंतर मिताली यांनी इंस्टाग्रामवर भारतीयांच्या मानसिकतेबद्दल आपले मत व्यक्त केले, ज्यावर आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
नियम पाळणाऱ्यांचेच नुकसान होते?
मिताली शर्मा यांच्या मते, भारतातील या समस्येचे मूळ शिक्षण, पैसा किंवा जागरूकतेचा अभाव यामध्ये नाही. त्यांनी सांगितले की, लोकांच्या मनात लहानपणापासूनच एक भीती किंवा धारणा निर्माण होते की, जर त्यांनी प्रामाणिकपणे सर्व नियमांचे पालन केले तर ते मागे राहतील आणि जे लोक नियम मोडून पुढे जातात, ते लवकर फायदा उठवतील.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
रोजच्या जगण्यातून दिले उदाहरणे
आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भारतीय समाजातील काही व्यावहारिक उदाहरणे दिली. मंदिराची रांग असो, रस्त्यावरील ट्रॅफिक जॅम असो किंवा नोकरी-व्यवसायातील स्पर्धा लोकांना सतत असे वाटते की शिस्तीने वागल्यास इतर लोक त्यांना मागे टाकून पुढे निघून जातील. हीच असुरक्षिततेची भावना लोकांना नियम तोडण्यास प्रवृत्त करते. ही मानसिकता केवळ गरिबांमध्ये किंवा अशिक्षितांमध्येच नाही, तर उच्चभ्रू वर्गातही तितकीच आहे. रस्त्यांवर महागड्या आणि लक्झरी कार चालवणारे लोकही सर्रास ट्रॅफिक नियम मोडताना दिसतात. त्यामुळे याचा आर्थिक परिस्थितीशी थेट संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाहा VIDEO
परदेशात जाताच भारतीयांचे वर्तन का बदलते?
"जे लोक भारतात नियम पाळत नाहीत, तेच लोक परदेशात पाऊल ठेवताच तिथल्या नियमांचे तंतोतंत पालन करू लागतात. याचे कारण तिथली मजबूत व्यवस्था आहे. तिथे नियम मोडल्यास कडक कारवाई होते आणि प्रत्येकाला आपल्या पाळीची वाट पाहावीच लागते. तिथे नागरिकांना विश्वास असतो की सिस्टीम सर्वांशी समान वागेल, असं मिताली शर्मा यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
सोशल मीडियावरील युजर्समध्ये मतभेद
अनेक नेटीझन्सनी मितालीच्या मताशी पूर्ण सहमती दर्शवली आहे. भारतातील सिस्टमवर लोकांचा विश्वास नसल्यानेच 'जुगाड' किंवा नियम तोडण्याची प्रवृत्ती वाढीस लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही युजर्सच्या मते, केवळ व्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही. नागरी जाणीव ही प्रत्येक व्यक्तीची 'वैयक्तिक जबाबदारी' आहे. जोपर्यंत लोक स्वतःहून बदलत नाहीत, तोपर्यंत देश बदलणार नाही.