Palghar Waterfall Video: पालघरमधील वांद्री धरणाच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या रौद्ररुपाचा अत्यंत थरारक आणि तितकाच धक्कादायक अनुभव आला आहे. मुसळधार पावसामुळे अवघ्या 2 मिनिटांत धबधब्याचे पाणी प्रचंड वेगाने वाढले आणि पाहता पाहता पर्यटकांचा आनंद थेट मृत्यूच्या भीतीत बदलला. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पावसाळ्यात धबधब्यांवर जाणे किती अंगाशी येऊ शकते, हेच यातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
अवघ्या 2 मिनिटांत धबधब्याला आला पूर
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सुरुवात अत्यंत सामान्य झाली होती. मुसळधार पावसात महिला आणि लहान मुलांसह अनेक पर्यटक धबधब्याच्या पाण्यात आनंदाने भिजत होते. मात्र, अवघ्या 2 मिनिटांत संपूर्ण चित्र पालटले. डोंगरावरून अचानक पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढला आणि पाण्याचा रंग चिखलमय झाला.
पाण्याचा वेग इतका जास्त होता की, लहान मुले आणि मोठे लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाण्यापासून वाचण्यासाठी एकमेकांचे हात पकडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आटोकाट प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
( नक्की वाचा : मुंबईजवळच्या जिल्ह्यात या मोसमातील आठवा रेड अलर्ट जाहीर, बुधवारीही शाळेला सुट्टी देण्याची प्रशासनाची घोषणा )
स्थानिक तरुण ठरले देवदूत
हा थरार सुरू असतानाच स्थानिक नागरिक आणि प्रवीण नावाच्या एका स्थानिक तरुणाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकलेल्या महिला आणि मुलांना योग्य दिशा दाखवत, एकमेकांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच तिथे उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी केवळ व्हिडिओ न काढता अडकलेल्या लोकांना बाहेर येण्यासाठी मोठी मदत केली, ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांचे प्राण वेळेत वाचले.
रील आणि पिकनिकपेक्षा जीव महत्त्वाचा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या पर्यटकाने सांगितले की, हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही, तर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्ट केला आहे. पावसाळ्यात धबधब्यांची आणि नद्यांची पाणीपातळी अचानक वाढते, त्यामुळे अशा ठिकाणी जाताना सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावरील रील किंवा केवळ एका दिवसाच्या पिकनिकसाठी स्वतःचा आणि लहान मुलांचा जीव धोक्यात घालणे अजिबात योग्य नाही, अशी भावनिक सादही त्याने नेटीझन्सना घातली आहे.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
राज्यात सध्या मान्सूनचा जोर प्रचंड वाढला असून प्रशासनाने आधीच नागरिकांना नद्या, धबधबे आणि धोकादायक जलकुंभांजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. डोंगराळ भागात वरच्या बाजूला पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खालच्या प्रवाहात अवघ्या काही सेकंदांत पूर येतो. पालघरमधील या घटनेने प्रशासनाच्या या इशाऱ्यांचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले असून पर्यटकांनी आता तरी शहाणपण घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
इथे पाहा VIDEO