HAKA protest againt sikh procession in New Zealand : दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये अचानक वातावरण तणावपूर्ण झालं. निमित्त होतं ते ऑकलंडमधील शीख समुदायानं काढलेल्या नगर कीर्तनाला झालेला विरोध...हे कीर्तन शांततेनं सुरू असतानाच न्यूझीलंडमधील एक कट्टरपंथी गट अचानक या कीर्तनासमोर आला आणि त्यांनी आक्रमकतेनं या कीर्तनाला विरोध केला. 'हे न्यूझीलंड आहे भारत नाही' असं जवळपास धमकावलंच गेलं. का घडलं हे, शांततेनं आपलं कीर्तन करणाऱ्या शीखांविरोधात एवढा राग का, भारताविरोधात गेल्या काही दिवसांत परदेशात रोष का वाढतोय.
परदेशात भारतीयांविरोधातील रोष का वाढतोय?
खरंय, 'हा न्यूझीलँडच आहे, भारत नव्हे. मात्र ज्या पद्धतीनं हे घडलं तेही भारतीयांविरोधात, तसं भारतातही कुणा परदेशी समुदायासह घडत नाही. कारण ती भारतीय संस्कृती नाहीच. न्यूझीलँडमध्येही आजवर असं घडलं नव्हतं मात्र दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारामुलळे ऑकलँडमधली स्थिती बिघडली.
न्यूझीलँडमध्ये स्थायिक झालेल्या शीख समुदायाकडून ऑकलंड शहरात एक नगर कीर्तन काढण्यात आलं होतं. हे नगर कीर्तन वेगवेगळ्या परिसरातून अतिशय शांततापूर्ण आणि धार्मिक वातावरणात पार पडत होते. पुन्हा गुरुद्वारात ते पोहोचणार होतं, तेही कुणालाही कोणताही अडथळा निर्माण न करता. मात्र अचानक न्यूझीलँडमधील स्थानिकांनी हे कीर्तन अडवलं. नुसतं अडवलंच नाही तर शीख समुदायासमोर आक्रमक होतं हाका डान्स केला आणि या धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात लक्ष वेधून घेत होता तो एक फलक THIS IS NEWZELAND, NOT INDIA! या फलकातून हा आंदोलकांचा गट आपला विरोध दर्शवत होता.
'डेस्टिनी चर्च'चे नेते ब्रायन तमाकी यांच्या समर्थकांनी हा विरोध केला होता. गुरुद्वारेच्या नजीक 30 ते 35 स्थानिक लोकांचा समूह समोर आला. त्यांनी नगर कीर्तनाच्या समोर उभे राहत रस्ते रोखले आणि नारे देऊ लागले. यावेळी हा इमिग्रेशन आणि सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न आहे, असं सांगत आंदोलकांनी कीर्तनाला विरोध केला होता. मात्र यावेळी शीख समुदायानं प्रचंड संयम दाखवला आणि वातावरण अधिक बिघडणार नाही अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकाराचा, विरोधाचा सामना केला. खरंतर शीख समुदायाला या गटाकडून चिथावणी दिली जात होती, तरी समुदायानं मात्र कोणतीही घोषणाबाजी केली नाही. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्या मदतीनं शीखांनी आपला धार्मिक कार्यक्रम पूर्ण केला. शीखांच्या या संयमाचं, शांततापूर्ण स्वभावाचं सोशल मीडियावर आणि जगभरातून कौतुक करण्यात आलं आहे. तर न्यूझीलँडमधील या विशिष्ट गटावर टीका करण्यात आली.
THIS IS OUR LAND. THIS IS OUR STAND. 🇳🇿
— Brian Tamaki (@BrianTamakiNZ) December 20, 2025
Today, True Patriots stood their ground in South Auckland.
No violence.
No riots.
Just my young men performing a haka…face-to-face…to send a clear message:
KEEP NZ, NZ.
While parts of Manurewa were shut down for hours by Sikhs and… pic.twitter.com/GjN9MYq1W4
न्यूझीलँडमध्ये हा प्रकार आज घडलेला नाही. गेल्या काही काळापासून न्यूझीलँडमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांविरोधात रोष वाढतोय. त्यातही भारतीयांविरोधात अधिक राग व्यक्त केला जातोय. हे केवळ न्यूझीलँडमध्येच घडतंय असं नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय नागरिकांना द्वेषाचा सामना करावा लागलाय.
भारतीयांविरोधात अमेरिका, न्यूझीलंड, इंग्लंडमध्ये इतका रोष का आहे?
एकीकडे न्यूझीलँडमधील काही कट्टरपंथींनी भारतीयांना विरोध केलेला असतानाच देशपातळीवर मात्र न्यूझीलँडनं भारतासह मुक्तव्यापार करारावर स्वाक्षरी केली
भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (FTA) सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब झालं. न्यूझीलँडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी याची घोषणा केली. या करारामुळे न्यूझीलँडच्या निर्यातदारांना भारतातील मध्यमवर्गापर्यंत सहज पोहोचता येईल. करारानुसार, न्यूझीलँडमधून भारतात येणाऱ्या ९५% वस्तूंवरील आयात शुल्क (टॅरिफ) एकतर रद्द करण्यात आले आहे. किंवा लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहे. यापैंकी निम्म्याहून अधिक उत्पादने पहिल्या दिवसापासून शुल्कमुक्त होतील. या कराराचा थेट परिणाम सामान्य भारतीय ग्राहकांच्या खिशावर होणार आहे
न्यूझीलँडमधून येणारी कीवी, सफरचंद या फळांवरील करात कपात
लोकर आणि त्यापासून बनवलेली उत्पादने, लाकूड आणि काही विशिष्ट प्रकारचे दुग्धजन्य पदार्थही स्वस्त. न्यूझीलँड सरकारच्या मते, 50% पेक्षा जास्त वस्तूंवर 'डे-वन' म्हणजे करार झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच कोणतेही शुल्क लागणार नाही. यामुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या मध्यमवर्गासाठी परदेशी फळे, वाइन आणि इतर दुग्धजन्य पदार्थ स्वस्त झालेत. तर न्यूझीलँड भारतात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
न्यूझीलँडने हा करार भारताची वाढती आर्थिक ताकद लक्षात घेऊन केला आहे. कीवी सरकारचा अंदाजानुसार 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 12 ट्रिलियन न्यूझीलंड डॉलर म्हणजेच सुमारे ₹627.21 लाख कोटी) इतकी होईल. न्यूझीलँडच्या व्यापाऱ्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे, कारण येथील लोकसंख्या आणि वाढती खरेदी क्षमता त्यांच्या दुग्धव्यवसाय, ताजी फळे आणि लोकर उद्योगासाठी जगातील सर्वात मोठे व्यासपीठ बनू शकते. हा करार गेल्या 10 वर्षांपासून रखडला होता. याचवर्षी मार्चमध्ये दोन्ही देशांनी पुन्हा यावर चर्चा सुरू केली आणि अवघ्या 9 महिन्यांत तो अंतिम केला. एकीकडे न्यूझीलँडच्या अर्थव्यवस्थेसाठी भारत महत्त्वाचा असतानाच न्यूझीलँडमध्ये हा भारतविरोध वाढतोय. एकीकडे भारत-न्यूझीलँडमध्ये मुक्त व्यापार करार होतो, म्हणजेच न्यूझीलँडच्या अर्थव्यवस्थेत भारताचं ही आता महत्त्वाचं स्थान असताना हा भारतविरोध किती योग्य?
खरंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता आवाका पाहूनच गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलिया, यूएई सारख्या देशांनीही भारतासह मुक्त व्यापार करार केलाय. हा सातवा मुक्त व्यापार करार आहे. हे सर्व विकसित अर्थव्यवस्थांसोबत आहेत, ज्यांचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. भारताशी स्पर्धा करण्याऐवजी आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक असलेल्या देशांशी व्यापार संबंध वेगाने वाढवत आहोत हे स्पष्ट होतंय."
भारताने गेल्या 5 वर्षांत 7 मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी केली आहे.त्यामुळे भारताची जागतिक व्यापार भागीदारी मजबूत झाली आहे. अशात भारतीय समाजाविरोधात या मोठ्या देशांमध्ये वाढणाऱ्या विरोधाकडे तिथल्या सरकारांना दुर्लक्ष करून चालणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world