
गुजरातच्या अहमदाबादमध्ये बुधवारी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान प्रवाशांनी भरलेलं होतं. अहमदाबाद विमान अपघाताबाबत (Ahmedabad plane crash) एका तज्ज्ञाने काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार विमानाची पक्ष्यांशी धडक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, अहमदाबाद विमानतळाजवळ पक्ष्यांशी टक्कर झाल्यामुळे कदाचित विमानाला आवश्यक वेग पकडता आला नाही. त्यामुळे ते खाली कोसळले. या विमानात एकूण 242 जण होते. त्यात 230 प्रवासी होते. तर विमान क्रूचे 10 सदस्य होते. यांच्यासह दोन वैमानिक यांचा ही समावेश होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी वरिष्ठ वैमानिक कॅप्टन सौरभ भटनागर म्हणाले, "प्रथमदर्शनी असं वाटतं की, पक्ष्यांच्या धडकेमुळे दोन्ही इंजिनची शक्ती (पॉवर) संपली असावी. उड्डाण एकदम योग्य होतं. असं वाटतं की, गियर (Gear) वर घेण्यापूर्वीच विमान खाली उतरू लागलं, जे फक्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा इंजिनची शक्ती संपते. त्यामुळे हा अपघात झाला असावा. मात्र हे सर्व चौकशीतून नेमकं कारण समोर येईल असं ही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "फुटेजवरून असं दिसतं की उड्डाण कोणत्याही अडचणी शिवाय झालं होतं. विमान नियंत्रित पद्धतीने खाली उतरलं. वैमानिकाने 'मेडे कॉल' केला होता, ज्याचा अर्थ ही एक संकटमय (distress) स्थिती होती." एअर इंडियाचं विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केल्यानंतर लगेचच दुर्घटनाग्रस्त झालं. विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.
विमान क्रॅश झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमान क्रॅश होऊन त्यानंतर आग आणि धुराचे लोट उठताना दिसले आहेत. अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचाव कार्य अजून सुरू आहे. मृत्यांचा आणि जखमींचा आकडा अजूनही समोर आला नाही. पण पक्षांच्या थव्याला झालेल्या टक्करमुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world