भारत आणि इराण यांच्यातील उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटींना मोठे यश मिळाले आहे. इराणने भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू टँकर्सना 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (Strait of Hormuz) या संवेदनशील सागरी मार्गातून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांच्यात नुकतीच फोनवर महत्वपूर्ण चर्चा पार पडली. या चर्चेत सागरी सुरक्षा आणि व्यापारिक हितसंबंधांवर सविस्तर चर्चा झाली. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा मुद्दा जयशंकर यांनी प्रामुख्याने मांडला होता. या चर्चेनंतर इराणने भारताला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय टँकर्सच्या सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. अमेरिका, युरोप आणि इस्रायलमधील जहाजांना अजूनही निर्बंध आणि हल्ल्यांचा धोका असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन जहाजांचा प्रवास
राजनैतिक चर्चेनंतर लगेचच दोन भारतीय जहाज "पुष्पक" आणि "परिमल", होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करताना आढळले. प्रादेशिक तणावामुळे अनेक देशांच्या जहाजांना गंभीर धोका असताना त्यांचा सुरक्षित मार्ग हा एक महत्त्वाचा संकेत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना, अनेक परदेशी जहाजांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत असताना आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम होत असताना ही मदत मिळाली आहे.
(नक्की वाचा- फारुख अब्दुल्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला! लग्नसमारंभात गोळीबार; थरारक घटनेचा VIDEO समोर)
स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचे महत्त्व काय?
'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% ते 30% व्यापार याच अरुंद मार्गातून होतो. इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेला हा मार्ग सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. गेल्या काही काळापासून या भागात वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध किंवा हल्ल्यांचे सावट होते. अशा परिस्थितीत भारताला मिळालेली ही सवलत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारतासाठी याचे फायदे
- भारताच्या कच्च्या तेलाची आयात प्रामुख्याने याच मार्गावरून होते. आता सुरक्षित प्रवासामुळे पुरवठ्यात अडथळा येणार नाही.
- भारतीय जहाजांवरील खलाशी आणि कोट्यवधी रुपयांच्या मालाची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे.
- या निर्णयामुळे भारत आणि इराणमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.