Ajit Pawar News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पुणे जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव बारामतीतील स्थानिकांच्या मनामध्ये एक गंभीर चिंता निर्माण झालीय. पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे प्रतीक ठरलेले अजित पवार हे स्थानिकांसाठी दादा होते. परिसरातील विकासकामांसाठी कधीही पवारांकडे जावे लागले नाही, असे बारामतीतील नागरिक म्हणणंय. कारण ते स्वतःहून नावीन्यपूर्ण योजना आणण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असत. विमान अपघातात निधन झालेल्या अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (29 जानेवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर शोकमग्न स्थानिकांच्या मनात आता आपल्या विभागाच्या भविष्यासंदर्भात चिंता निर्माण झाल्याचे दिसतंय.
शिक्षक गणेश लोंढे यांनी सांगितले की, बारामतीचा विकास मॉडेल हा अजित पवार यांच्या दूरदृष्टी आणि विचारसरणीचा भाग होता. पुढे ते असंही म्हणाले की,"दादांकडे कधी विकासकामांची किंवा नव्या योजनांची मागणी करावी लागली, असे मला आठवत नाही. ते नेहमीच नवे प्रयोग आणि उपक्रम राबवण्यास उत्सुक असत. एका क्षणात आम्ही त्यांना गमावले आणि आता पुढे अंधारच दिसतोय. बारामतीच्या भवितव्याबाबत प्रत्येकजण चिंतेत आहे."
Photo Credit: PTI
बारामतीच्या इतिहासातील काळा दिवस
स्थानिक वकील विलास गायकवाड यांनी या विमान अपघाताला बारामतीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे म्हटले. गायकवाड म्हणाले की,"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित दादा आता आपल्यात नाहीत, ही बाब आमच्यासाठी अजूनही अविश्वसनीय आहे. आता भविष्यात काय होईल, हे सध्या स्पष्ट दिसत नाही."
Photo Credit: PTI
महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत महत्त्वाची भूमिका
स्थानिकांनी गुन्हेगारीविरोधात विशेषतः महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत अजित पवार यांनी अवलंबलेली कठोर भूमिकेच्या आठवणींनाही उजाळा दिला. विद्यार्थिनी वैशाली लोखंडे म्हणाली की,"त्यांच्या कडक धोरणांमुळे आणि गुन्हेगारांविरोधातील कठोर कारवाईमुळे महिलांना सुरक्षित वाटत होते. त्यामुळे महिला उशीरापर्यंतही निर्धास्तपणे शहरात वावरू शकत होत्या."
Photo Credit: PTI
"विकासाची गती मंदावेल"
राहुल नाहरगोजे यांना अजित पवार यांचे निधन स्वीकारणे अजूनही कठीण जात आहे. नाहरगोजे यांनी सांगितलं की, "अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने जो विकास केला, तसे आदर्श उदाहरण कदाचित देशातील इतर कोणत्याही शहरात पाहायला मिळणार नाही. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुढे काय? मला वाटते की येथील विकासाची गती आता मंदावेल."
Photo Credit: PTI
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.
(Content Source PTI)