सूरज कसबे, पुणे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोजी पिंपरी-चिंचवडमधील प्रचारादरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे सूचक आणि महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. "काकांच्या पुण्याईनेच माझं बरं चाललंय" असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचे कौतुक केले असून राजकीय विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
अजित पवारांनी म्हटलं की, "आम्ही यावेळेस तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलं आहे. आम्हाला आता कोणाशीही वाद घालायचा नाही. मागे जे काही घडलं, ते गंगेला मिळालं, आता आपल्याला एकोप्याने काम करायचं आहे," असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
"काकांच्या पुण्याईनेच माझं बरं चाललंय"
अजित पवार यांनी भाषणादरम्यान थेट गळ्याची शपथ घेत विधान केले. "माझं सगळं काकांच्या (शरद पवार) पुण्याईनेच लय बरं चाललंय," असे म्हणत त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शरद पवारांना दिले. इतकेच नाही तर शरद पवारांच्या नेतृत्वाचा उल्लेख 'पुढची दृष्टी असणारे नेतृत्व' असा केला.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, धडकी भरवणारा VIDEO आला समोर)
'भ्रष्टाचाराचा आका' संपवण्याचा निर्धार
महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि दादागिरी सुरू असून, या सत्ताधाऱ्यांना पैशांची मस्ती आणि सत्तेची गुर्मी आली आहे. आता हे कारभारी बदलण्याची वेळ आली असून, भ्रष्टाचाराचा 'आका' संपवून त्यांना त्यांची जागा दाखवा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांनी विशेषत, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पवार म्हणाले की, ज्याच्या हातात 2017 पासून शहराचा कारभार होता, त्याला मीच नगरसेवक केले होते. विलास लांडे यांना अडचण नको म्हणून त्याला स्थायी समितीचे अध्यक्षपदही दिले. मात्र, या पठ्ठ्याने तिथेच हातसाफ केला. पुढे लांडेंच्याच विरोधात निवडणूक लढवून तो निवडून आला. आज यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी कोठून आली ? एवढा पैसा आला कोठून ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना त्यांनी स्पष्ट केले की, शहराच्या हितापेक्षा स्वतःचे खिसे भरण्यालाच सत्ताधाऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. ही 'गुर्मी' उतरवण्यासाठी जनतेने आता खंबीर भूमिका घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी थेट आमदारांच्या मालमत्तेवर बोट ठेवल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.