Ashadhi Wari 2026: आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निघालेल्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाची आणि तातडीची जाहीर सूचना जारी केली आहे. हवामान वेधशाळेने पुणे जिल्ह्यासाठी सोमवारी (6 जुलै) 'रेड अलर्ट' जारी केला आहे. देहू आणि आळंदी परिसरात अतिशय मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहराला जोडणारे चारही प्रमुख पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने भाविकांना थेट देहू किंवा आळंदीत न जाता पुण्यातूनच पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान 8 जुलै रोजी आळंदी येथून होणार आहे. पण सध्याची पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे.
आळंदीचे 4 ही पूल पाण्याखाली; संपर्क तुटला
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. इंद्रायणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे सध्यातरी आळंदी शहरात येणे आणि प्रवेश करणे पूर्णपणे असुरक्षित आणि धोकादायक बनले आहे.
भाविक जेथे असतील, तेथेच सुरक्षित थांबा!
ज्या वारकरी, धारकरी आणि भाविकांनी आळंदी किंवा देहूच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे, त्यांना प्रशासनाने आवाहन केले आहे की, त्यांनी सध्यातरी पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. भाविकांनी सुरक्षेच्या कारणास्तव ज्या ठिकाणी आहात, त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे.
(नक्की वाचा : Maval Landslide: मावळात 'माळीण'ची पुनरावृत्ती! अख्खं कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं, तिघांचे मृतदेह सापडले)
थेट देहू-आळंदीला जाणे टाळा, पुण्यातून व्हा सहभागी
जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व भाविकांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी थेट देहू किंवा आळंदी परिसरात गर्दी न करता, पुणे शहरातून या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल आणि वारकऱ्यांची सुरक्षाही राखली जाईल.
Photo Credit: Government Administration
(नक्की वाचा: Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांसाठी चिंताजनक वृत्त! इंद्रायणीला महापूर, नदीवरील 4 पूल पाण्याखाली! प्रशासनाकडून अलर्ट जारी)
नदीपात्र आणि घाट परिसराकडे जाण्यास सक्त मनाई
आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस यंत्रणेकडून नदीपात्र, आळंदी घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाण्यास कडक प्रतिबंध करण्यात आला आहे. वारी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे.
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर निसर्गाचे सावट असले तरी वारकऱ्यांनी आधी स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.